राज्यात ठिकठिकाणी पावसाचा जोर वाढला असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाने जोर धरला असून पंचगंगा नदीने पहाटे तीन वाजता इशारा पातळी गाठली आहे. आता ती धोका पातळीकडे हळूहळू सरकत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. पुराचे सावट असलेल्या भागातील नागरिकांना सतर्क करण्याची मोहीम महापालिका प्रशासनाने राबवायला सुरुवात केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे नदीची पाणी पातळी वाढत चालली आहे. काल (२३ जुलै) सायंकाळी पंचगंगा नदी इशारा पातळीकडे वाटचाल करत होती. पहाटे तीन वाजता ३९ फूट ही इशारा पातळी पंचगंगेने गाठली. जिल्ह्यातील पाण्याखालील एकूण बंधाऱ्यांची संख्या ८२ इतकी झाली आहे.

कोल्हापुरातील रस्ते बंद

पुराचे पाणी आल्यामुळे शिवाजी पूल – गंगावेश रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत सुतारवाडा, उलपे मळा, कसबा बावडा येथील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा >> अतिवृष्टीमुळे आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवा – दीपक केसरकर

विदर्भात पूरस्थिती कायम

 विदर्भात मुसळधार पावसाचा जोर कायम असून चंद्रपूर, बुलढाणा, यवतमाळ जिल्ह्यांतील पूरस्थिती कायम आहे. गेल्या १० दिवसांत पुरामुळे किमान १६ जण दगावले असून घरे व शेतीचीही मोठय़ा प्रमाणात हानी झाली आहे. चंद्रपूरला पुराचा वेढा पडल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे चंद्रपूर शहरालगतची इरई नदी ऊर्ध्व दिशेने वाटचाल करत आहे. शहरातील सखल आणि नदीकाठच्या भागांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. चंद्रपूर शहरातल्या रहमतनगर, सिस्टर कॉलनी, तिमांडे लेआऊटमधल्या हजारो घरांना पुराच्या पाण्याचा विळखा पडला आहे. पाणी वाढण्याच्या भीतीने अनेक लोकांनी स्थानांतरण करणे सुरू केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिंधुदुर्गात संततधार सुरूच

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक १११.३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ८०.५ मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी १७९६.६ मि.मी. पाऊस झाला आहे. दरम्यान गगनबावडा कोल्हापूर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली होती, तर जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आल्याने रस्त्यावर पाणी आले होते.  कणकवली ते कोल्हापूर मार्गावर मांडकुली गगनबावडा नदीला पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तसेच तिलारी आंतरराज्य प्रकल्पातून पाणी विसर्ग सुरू झाल्याने भेडशी खालचा बाजारात पाणी आले होते