कोल्हापूर : विशाळगड येथील १४ अतिक्रमणे शनिवारी जमीनदोस्त करण्यात आली. सुमारे वर्षभरानंतर विशाळगडावर अतिक्रमणे काढण्यात आली. किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणांवरून गतवर्षी मोठा वादंग झाला होता. यानंतर न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली होती. न्यायालयाचे आदेश नसलेल्या ठिकाणचे अतिक्रमणे काढले जावे, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी लावून धरली होती. या पार्श्वभूमीवर आज येथे अतिक्रमणे काढण्यात आली. विशाळगडावरील ७ रहिवासी घरे, ४ दुकाने व ३ इतर अशी १४ अतिक्रमण काढल्याचे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी सांगितले. या वेळी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
किल्ले विशाळगडावर अतिक्रमणे वाढू लागल्यानंतर गेल्यावर्षी जुलै महिन्यात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक बनल्या होत्या. या प्रश्नात उतरलेल्या संभाजीराजे छत्रपती यांनी अतिक्रमण हटवण्याबाबत राज्य शासन, जिल्हा प्रशासन निष्क्रिय ठरल्याचा आरोप करीत शिवप्रेमींना गडावर येण्याचे आवाहन केले. विशाळगडावर दगडफेकीचा प्रकार घडला. गडावरील स्थानिकांनी शस्त्र घेऊन धमकावल्याचा आरोप हिंदुत्ववाद्यानी केला होता. त्याचीच प्रतिक्रिया म्हणून गडाच्या पायथ्याशी असलेल्या हजारो शिवप्रेमीमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली. जखम विशाळगडची असताना ती चिघळली तीन किमी अंतरावर असणाऱ्या गजापूर, मुसलमान वाडीत. येथील घरे, दुकाने, वाहने यांची नासधूस, मारहाणीच्या हिंसक घटना घडल्या. या वेळी पोलीस प्रशासनाची निष्क्रियता चव्हाट्यावर आली होती. दुसरीकडे तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नाकर्तेपणामुळेच विशाळगडचा प्रश्न तापल्याची टीका हिंदुत्ववादी संघटनांनी चालवली आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करताना विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीने हसन मुश्रीफ यांच्या दबावामुळेच विशाळगडावरील अतिक्रमण निघण्यास विलंब झाल्याचा आरोप केला होता. या साऱ्या गदारोळात आजवर धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार पुरणारे मुश्रीफ हे महायुतीच्या भगव्या छावणीत गेले असल्याने अशा बिकट प्रसंगी नेमकी कोणती भूमिका घ्यायची या पेचात अडकलेले होते.
कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यातील बेदिलीचे दर्शन विशाळगड प्रश्नावरून दिसले होते. संभाजीराजे छत्रपती यांच्यासमोर विध्वंस सुरु होता. त्यांच्या समर्थकांच्या समाज माध्यमात लढाई जिंकल्याप्रमाणे अभिनंदनाचा वर्षाव होत राहिला. उद्धवस्त झालेल्यांचे सांत्वन करण्यासाठी गेलेले खासदार शाहू महाराज यांना या प्रकारावरून दुःख व्यक्त करीत दिलगिरी व्यक्त करावी लागली होती. विधान परिषदेतील काँग्रेसचे गट नेते सतेज पाटील यांनी विशाळगड हिंसाचार हे राज्यसरकारचे अपयश असल्याची टीका केली. त्यावर लगेचच भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांनी केलेली मदत म्हणजे पुतना मावशीचे प्रेम असल्याची टीका केली आहे. एकाच घरातील शाहू छत्रपती – संभाजी महाराज यांच्या दोन भूमिका चालतात कशा, असे प्रश्न उपस्थित करून महाडिक यांनी विरोधकांची राजकीय कोंडी केली होती.