कोल्हापूर : पहेलगाम येथील हल्ल्याचा भारत वाचपा काढणार आहे. पाकिस्तानला धडा शिकवला जाईल. आजचा भारत पूर्वीचा नाही तर तो घुसून मारणारा आहे, असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. जयसिंगपूर येथे नगर परिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा व संग्रहालय शिवतीर्थ लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते पार पडला. जयसिंगपूर नगरपरिषदेच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा मानपत्र देऊन नागरी सत्कार करण्यात आला. तसेच या कार्यक्रमात शिवतीर्थ परिसर उभारण्यासाठी काम केलेल्या विविध पुरवठादारांचे आणि तालुक्यातील विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या तरुणांचा सन्मान करण्यात आला.
ते पुढे म्हणाले, शिवाजी महाराजांमुळे गडकोटांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. त्याचे जतन, संवर्धन करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या पाठपुराव्यामुळे शिवाजी महाराज पुतळा संग्रहालय मार्गी लागले. जयसिंगपूर मध्ये दोन हजार कोटीची विकास कामे झाली असून या नगरीला विकासाचे मॉडेल करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुढे नेत, त्यांचे आदर्श विचार लोकांच्या मध्ये रुजवण्यासाठी राज्य शासनाकडून शिव जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नुकतेच महाराष्ट्रातील बारा किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्को मार्फत घोषित झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा स्वाभिमान असून महाराष्ट्रातील गडकोट किल्ल्यांचे संवर्धन ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रास्ताविक करून विकासकामांची माहिती दिली. ते म्हणाले राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांनी १९१६ साली स्थापन केलेल्या जयसिंगपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा उभारणे, वस्तू संग्रालय व ग्रंथालय बांधकाम करणेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरपरिषदेस शासनाकडून मोफत जागा दिलेली आहे. तसेच शिवतीर्थ बांधणे कामासाठी रक्कम रुपये ७ कोटी ५० लक्ष इतका निधी मंजूर केला. शिवतीर्थ वास्तूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यालगत असलेल्या संग्रालयात इतिहासकालीन शस्त्र व दुर्मिळ पत्रव्यवहार लोकांना पाहणेसाठी उपलब्ध होणार आहे. याशिवाय ग्रंथालयाचे बांधकाम पुर्ण झाले असल्याने शहरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांची तयारी करणेच्या दृष्टीने समृद्ध पुस्तकांचे भांडार उपलब्ध होणार आहे. पुतळ्याचे पूजन माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, नीतू पाटील यड्रावकर यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहू महाराज, खासदार धैर्यशील माने यांची भाषणे झाली. मुख्याधिकारी टीना गवळी, अधिकारी, नागरिक उपस्थित होते.