कोल्हापूर : लोकनेते बाळासाहेब देसाई हे साताऱ्याचे असतानाही त्यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापुरातच झाले पाहिजे असा आग्रह लावून धरला होता. त्यांच्या तळमळीतूनच हे विद्यापीठ आकाराला आले, असा दावा पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांनी येथे केला.
शिवाजी विद्यापीठाच्या लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनातर्फे ‘विचारधन: लोकनेते बाळासाहेब देसाई यांची विधिमंडळातील भाषणे भाग-१’ या विजय चोरमारे संकलित व संपादित ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.
शिवाजी विद्यापीठाची संकल्पना पुढे आली तेव्हा ते कोल्हापूर येथे की सातारा येथे असावे याबाबत दुविधा होती, असे स्पष्ट करतानाच मंत्री देसाई यांनी हे विद्यापीठ कसे आकाराला आले याचा इतिहास नमूद केला. ते म्हणाले, ‘मंत्रिमंडळासमोर या विषयीचा प्रस्ताव येणार असल्याचे समजताच प्रकृतीअस्वास्थ्य असतानाही बाळासाहेब देसाई त्या बैठकीसाठी पोहोचले. आणि स्वतः साताऱ्याचे
असतानाही कोल्हापूर येथेच विद्यापीठ होण्यासाठी आग्रह लावून धरला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज आणि कोल्हापूर या तीन बाबी त्यांच्या श्रद्धास्थानी असल्याने कोल्हापूरकडे त्यांचा कल राहिला.
आबिटकरांची साताऱ्याशी नाळ
माझे खटाव येथील चुलते बाळासाहेब देसाई यांचे कार्यकर्ते होते. ते बाळासाहेब देसाई यांच्या आठवणी आम्हाला सांगायचे. आज मी त्यांच्या नातवासमवेत काम करतो आहे, याचा मला मनस्वी आनंद आहे, अशा शब्दांत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आपली साताऱ्याशी असलेले नाते उलगडून सांगितले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, की लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी कोल्हापुरात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण पूर्ण केले. या कृतज्ञतेपोटीच त्यांनी कदाचित शिवाजी
विद्यापीठ कोल्हापूर येथे होण्याविषयी ठाम राहिले. प्रारंभी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. देसाई व आबिटकर यांच्या हस्ते संयुक्तरीत्या ग्रंथ प्रकाशन करण्यात आले. अध्यासनाचे समन्वयक डॉ. अवनीश पाटील यांनी प्रास्ताविक, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमासाठी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, मानव्यविज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, सल्लागार समितीचे सदस्य डॉ. अरुण भोसले, डॉ. भारती पाटील, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. विश्वनाथ पानस्कर, अशोकराव पाटील, जयराज देसाई, राजेंद्र देसाई, पृथ्वीराज देसाई, यशराज देसाई यांच्यासह देसाई कुटुंबातील सदस्य, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य, विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.