आयपीएलच्या बाराव्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाची कामगिरी अतिशय खराब राहिलेली आहे. सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये पहिल्या ४ क्रमांकामध्ये असलेला कोलकात्याचा संघ आता गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये कर्णधार दिनेश कार्तिक आणि संघ व्यवस्थापनाने घेतलेल्या निर्णयांवर प्रश्न निर्माण केले गेले. संघातली ही खदखद आता अष्टपैलू आंद्रे रसेलनेही बोलून दाखवली आहे.

“आमचा संघ चांगला आहे, मात्र तुम्ही चुकीचे निर्णय घेत असाल तर प्रत्येक वेळी तुम्ही सामना हराल. सध्या आम्ही हेच करतोय. माझ्याकडे वेळ असता, तर काही सामन्यांमध्ये आम्ही कसे चुकलो हे मी सांगितलं असतं. काही सामन्यांमध्ये आम्ही योग्य गोलंदाजांना संधी दिली नाही, तसं केलं असतं तर आम्ही सामना जिंकलो असतो.” मुंबईविरुद्ध सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत रसेल बोलत होता.

मुंबईविरुद्धचा सामना गमावल्यास कोलकात्याचा संघ बाराव्या हंगामात सलग सहावा सामना गमावेल. याचसोबत मुंबईविरुद्ध सामन्यात पराभव झाल्यास कोलकाता पहिल्या ४ स्थानांच्या शर्यतीमधून बाहेर पडेल. अनेक सामन्यांमध्ये कोलकात्याकडून फलंदाजीला रसेलला फलंदाजीसाठी योग्य स्थानावर पाठवण्यात आलं नाही, ज्याचा फटका कोलकात्याला बसला. त्यामुळे मुंबईविरुद्धच्या सामन्यात कोलकात्याचा संघ कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.