सलामीवीर रोहित शर्माचं धडाकेबाज शतक आणि कर्णधार विराट कोहलीच्या झंजावाती अर्धशतकी खेळाच्या जोरावर भारताने अखेरच्या वन-डे सामन्यात विजय मिळवत मालिकेत २-१ ने बाजी मारली आहे. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेलं २८७ धावांचं आव्हान भारताने २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई करत मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. रोहित शर्माने ११९ तर कर्णधार विराट कोहलीने ८९ धावा केल्या. ७ गडी राखून भारताने अखेरचा सामना जिंकला. अखेरच्या सामन्यात भारतीय डावाची सुरुवातही चांगली झाली. रोहित शर्मा आणि लोकेश राहुलने पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत आपले इरादे स्पष्ट केले. लोकेश राहुल माघारी परतल्यानंतर विराट आणि रोहित जोडीने अक्षरशः कांगारुंच्या नाकीनऊ आणले. प्रत्येक गोलंदाजांवर हल्लाबोल करत भारतीय फलंदाजांनी धावांचा ओघ सुरुच ठेवला. रोहित शर्माने यादरम्यान आपलं शतकंही साजरं केलं. रोहित-विराट जोडी भारताला विजय मिळवून देणार असं वाटत असताना रोहित झॅम्पाच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर विराटने श्रेयस अय्यरच्यासाथीने तुफान फटकेबाजी करत भारताला विजयाच्या जवळ आणलं. मात्र आपलं शतक पूर्ण करणं त्याला जमलं नाही. ८९ धावांवर असताना हेजलवूडच्या गोलंदाजीवर विराट त्रिफळाचीत झाला. यानंतर श्रेयस अय्यर आणि मनिष पांडे जोडीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज अखेरच्या सामन्यात भारतावर अंकुश लावण्यात अपयशी ठरले. त्याआधी, स्टिव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन या फलंदाजांनी केलेल्या आश्वासक खेळामुळे कांगारुंनी अखेरच्या वन-डे सामन्यात २८६ धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचचा निर्णय पुरता चुकला. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या षटकापासून भेदक मारा करत कांगारुंच्या धावगतीवर अंकुश लावला. मात्र स्मिथ आणि लाबुशेनच्या महत्वपूर्ण भागीदारीमुळे कांगारुंनी सन्मानजनक धावसंख्या गाठली. अवश्य वाचा - Ind vs Aus : कांगारुंच्या शेपटावर शमीचा पाय, ४ बळी घेत दिग्गजांना टाकलं मागे सलग दुसऱ्या सामन्यात डेव्हिड वॉर्नरला झटपट माघारी धाडण्यात भारताला यश आलं. यापाठोपाठ कर्णधार फिंचही चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात माघारी परतला. यानंतर लाबुशेन आणि स्मिथने तिसऱ्या विकेटसाठी १२७ धावा जोडल्या. ही जोडी कांगारुंना मोठी धावसंख्या उभारुन देणार असं वाटत असतानाच जाडेजाने लाबुशेनला माघारी धाडलं. त्याने ५४ धावा केल्या. यानंतर स्मिथने यष्टीरक्षक कॅरीला सोबतीला घेत संघाला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. दोन्ही फलंदाजांनी अर्धशतकी भागीदारी करत डावाला पुन्हा एकदा स्थैर्य दिलं. यादरम्यान स्मिथने आपलं शतकही पूर्ण केलं. कॅरी आणि टर्नर अखेरच्या षटकांमध्ये ठराविक अंतराने माघारी परतले. यानंतर स्मिथनेही फटकेबाजी करत संघाला २५० धावांचा टप्पा ओलांडून दिला. मात्र शमीच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो देखील बाद झाला. त्याने १३१ धावांची खेळी केली. अखेरीस तळातल्या फलंदाजांनी फटकेबाजी करत कांगारुंना २८६ या सन्मानजनक धावसंख्येपर्यंत आणलं. भारताकडून मोहम्मद शमीने ४, रविंद्र जाडेजाने २ तर नवदीप सैनी आणि कुलदीप यादवने प्रत्येकी १-१ बळी घेतला.