२०१८ सालात भारतीय क्रिकेट संघाच्या व्यस्त वेळापत्रकात आता आणखी एका दौऱ्याची भर पडली आहे. जून महिन्याच्या अखेरीस भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध दोन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. २७ आणि २९ जून रोजी भारत डबलीन येथे दोन आयर्लंडविरुद्ध दोन टी-२० सामने खेळणार आहे. २००७ सालानंतर भारतीय संघाचा हा आयर्लंडचा पहिला दौरा असणार आहे. मागच्या वेळी भारताने बेलफास्टच्या मैदानावर आयर्लंडविरुद्ध वन-डे सामना खेळला होता. ज्यात डकवर्थ लुईसच्या नियमानुसार भारताने ९ गडी राखून सामना जिंकला होता. रोहित शर्माने या सामन्यातून आपलं आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. NEWS: #TeamIndia to tour Ireland for T20Is.The two T20Is will be held in Dublin on June 27 & June 29, 2018.More details - pic.twitter.com/6105tP85jl— BCCI (@BCCI) January 10, 2018 मे महिन्याच्या अखेरीस आयपीएलचा अकरावा हंगाम संपल्यानंतर भारत इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्याआधी भारताला आयर्लंडविरुद्ध दोन टी-२० सामने खेळावे लागणार आहेत. इंग्लंड दौऱ्यात भारत ३ टी-२०, ३ वन-डे आणि ५ कसोटी सामने खेळणार आहे. भारतीय संघातले काही खेळाडू इंग्लंड दौरा सुरु होण्याआधी काऊंटी क्रिकेटमध्ये सहभागी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. आतापर्यंत टी-२० सामन्यात भारत आणि आयर्लंड केवळ एकदा समोरासमोर आले आहेत. २००९ च्या टी-२० विश्वचषकादरम्यान नॉटिंगहॅममध्ये भारत विरुद्ध आयर्लंड सामना खेळवण्यात आला होता, ज्यात भारताने ८ गडी राखून विजय मिळवला होता. मागच्या वर्षात आयर्लंडसह अफगाणिस्तानला आयसीसीने कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या देशाचा दर्जा बहाल केला होता.