मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा

वेगवान गोलंदाज प्रथमेश डाकेने (३/२३) प्रभावी गोलंदाजीला सर्फराज खान (५३ धावा) आणि शिवम दुबे (नाबाद ४४) यांच्या फलंदाजीची योग्य साथ लाभल्याने मुंबईने सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत पहिल्या विजयाची नोंद केली. मुंबईने अखेरच्या साखळी सामन्यात आंध्र प्रदेशला पाच गडी आणि सात चेंडू राखून पराभूत केले.

सुरुवातीचे सलग चार सामने गमावल्यामुळे आव्हान संपुष्टात आलेल्या मुंबईने प्रथम क्षेत्ररक्षण करताना आंध्र प्रदेशला २० षटकांत ८ बाद १५४ धावांवर रोखले. रिकी भुईने आंध्र प्रदेशसाठी ७८ धावांची खेळी साकारली. प्रत्युत्तरात कर्णधार सूर्यकुमार यादव (२२) आणि यशस्वी जैस्वाल (१३) लवकर बाद झाले. परंतु ४ बाद ६४ धावांवरून सर्फराज आणि दुबे यांनी पाचव्या गडय़ासाठी ८७ धावांची भागीदारी रचून मुंबईचा विजय सुनिश्चित केला.