क्रिकेटच्या भल्यासाठीच शिवसेना मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) निवडणुकीत सहभागी झाली आहे, असा दावा आमदार प्रताप सरनाईक करीत आहे; परंतु युती एमसीएच्या रिंगणातही दाखवू, अशी आशा k02निर्माण करून शिवसेनेने पाठ दाखवली आणि काँग्रेसच्या विजय पाटील यांच्याशी संधान साधले, असा आरोप भाजप नेते आशीष शेलार यांनी केला आहे. एमसीएच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शेलार यांच्याशी केलेली बातचीत.

राज्यात तुमचे युतीचे सरकार आहे, पण शिवसेना एमसीएच्या निवडणुकीत तुमच्यासोबत नाही. याबाबत काय सांगाल?

मुळातच एमसीएची निवडणूक मी राजकारणाचा भाग मानतच नाही. मी अनेक वष्रे बाळ म्हाडदळकर गटाचा सदस्य आहे. याच नात्याने मी उपाध्यक्षपदासाठी निवडणूक लढत आहे. मी विविध समित्यांवरही कार्य केले आहे. भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस किंवा शिवसेना अशी पक्षीय भावनेने या निवडणुकीकडे मी पाहत नाही.

तुम्हाला उपाध्यक्षपदाची एक जागा देऊ केल्याचे, एमसीएच्या राजकारणातसुद्धा युती टिकण्यासाठी प्रयत्न केल्याचे प्रताप सरनाईक सांगतात..

माझ्यापुढे प्रस्ताव ठेवणारे सरनाईक कोण? आणि राजकीय दृष्टय़ा सांगायचे, तर शिवसेनेचे सर्व वरिष्ठ नेते मुख्यमंत्र्यांकडे गेले होते. युतीचे सर्व जण एकत्रित लढू अशी आशा त्यांनी आधी निर्माण केली. मग परस्पर पाठ दाखवत, काँग्रेसच्या विजय पाटील यांच्याशी संधान साधले. त्यानंतर आपल्या नेत्यांचे अर्जसुद्धा भरून टाकले. हे सारे घडल्यानंतर अशा प्रकारे आव्हानात्मक निवेदन करणे हे कितपत विश्वासार्ह आहे?

एमसीएच्या प्रशासनात अनेक वर्षांपासून राजकीय व्यक्तींचा प्रभाव दिसून येत आहे. मुंबई क्रिकेटच्या विकासासाठी राजकीय नेत्यांचा कशा प्रकारे फायदा होतो?
एमसीएच्या व्यासपीठावर आम्ही क्रीडाप्रेमी प्रशासक म्हणून कार्यरत असतो. २०११मध्ये झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेच्या वेळी मी पायाभूत सुविधा समितीवर होतो. वानखेडे स्टेडियम या स्पध्रेसाठी सज्ज करताना शरद पवार आणि अन्य राजकीय नेत्यांचा खूप फायदा झाला होता.

या निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत भाजप आणि काँग्रेससोबत शिवसेना असे चित्र निर्माण झाले आहे, या विषयी काय सांगाल?
क्रिकेटच्या भाषेत सांगायचे, तर क्रिकेटमध्ये राजकारण नाही आणि राजकारणाच्या भाषेत सांगायचे तर भाजपला राष्ट्रवादीची गरजच नाही. भाजपने राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याविरोधातच राजकारण केले आहे. त्यामुळे याच्यात गल्लत करण्याचे कारणच नाही.
ल्ल शरद पवार निवडणुकीतून आपला अर्ज मागे घेणार आणि म्हाडदळकर गटाकडून तुम्ही अध्यक्षपदासाठी लढणार अशी क्रिकेटवर्तुळात चर्चा आहे?
हे कपोलकल्पित आहे. मी उपाध्यक्षपदासाठी लढतो आहे.

एमसीएची निवडणूक लढताना कोणती ध्येय-धोरणे निश्चित केली आहेत?

बरेचसे मुद्दे आहेत. प्रामुख्याने सांगायचे तर पूर्व उपनगर भागात मुंबई क्रिकेट असोसिएशनचे केंद्र असण्याची गरज आहे. तिथल्या लहान मुलांना आणि युवकांना मुख्य स्रोतातील क्रिकेटमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. मुंबई शहराच्या हद्दीतील अनेक मोकळ्या जागा क्रिकेटसाठी उपलब्ध करून देताना आवश्यक पावले उचलणे आवश्यक आहे. वांद्रे-कुर्ला संकुल येथील एमएमआरडीए मैदानाची अनेक प्रलंबित प्रकरणे मी सोडवू शकतो. उपाध्यक्षपदी निवडून आल्यावर मैदाने आणि कायदेशीर प्रकरणे सोडवू शकेन. अकादम्या आणि खेळासंदर्भातील कार्य माजी क्रिकेटपटू करतील.

मुंबईचे क्रिकेट ठाणे जिल्हा, पालघर इथपर्यंत गांभीर्याने पोहोचण्यासाठी तुमच्याकडे काय योजना आहेत?

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या परिघात असलेल्या भागामध्ये क्रिकेटच्या पायाभूत सुविधा पोहोचवण्यासाठी म्हाडदळकर गटाने काही योजना आखलेल्या आहेत. त्या आम्ही लवकरच प्रत्यक्षात राबवू.