माजी क्रिकेटपटू गावस्कर यांची सूचना

नवी दिल्ली : साऊदम्पटनच्या उष्ण वातावरणामुळे कोरडी झालेली खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना साहाय्य करील. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन या दोघांनाही भारताने खेळवावे, अशी सूचना महान माजी सलामीवीर फलंदाज सुनील गावस्कर यांनी केली आहे.

गेले काही दिवस साऊदम्पटनचे कमाल तापमान २५ अंश सेल्सिअसहून अधिक आहे. परंतु गुरुवारपासून येथे मुसळधार पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. या महत्त्वाच्या सामन्यात फक्त गोलंदाजी नव्हे, तर अष्टपैलू कौशल्य असणारे खेळाडूच तारू शकतात, असे मत गावस्कर यांनी व्यक्त केले.

‘‘अश्विन-जडेजा गोलंदाजीच्या माऱ्याचा जसा समतोल राखतात, तसाच फलंदाजीचा भारही भक्कमपणे सांभाळतात. जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या लढतीनंतर होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत बरेच काही हवामान आणि खेळपट्टी यावर अवलंबून असेल,’’ असे गावस्कर यांनी सांगितले.

‘‘भारतीय संघाला एखाद-दुसरा सराव सामना खेळता आलेला नाही. परंतु त्यांनी दोन संघ पाडून सामन्यांचा सराव केला. भारतीय संघात युवा आणि अनुभवी खेळाडू योग्य प्रमाणात आहेत. याशिवाय बरेचसे खेळाडू इंग्लंडमध्ये बऱ्याचदा गेले असल्याने तेथील वातावरण त्यांना पुरते अवगत आहे,’’ गावस्कर यांनी सांगितले.

अश्विन आपल्या अनुभवाच्या बळावर भारतीय संघाच्या रणनीतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. तमिळनाडूच्या या फिरकी गोलंदाजाची गोलंदाजी पाहणे, हे इरापल्ली प्रसन्ना आणि हरभजन सिंगला खेळताना पाहण्यासारखेच प्रेक्षणीय असते, असे गावस्कर यांनी नमूद केले.

रोहित कामगिरीत सातत्य राखेल!

२०१९मधील मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरी अनुभवी रोहित शर्मा इंग्लंड दौऱ्यावरही कायम राखेल. साऊदम्पटनला झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विश्वचषकातील सलामीच्या सामन्यात झळकावलेले शतक रोहितचा आत्मविश्वास उंचावेल, असे गावस्कर यांनी सांगितले.

टीकेनेच इथपर्यंत पोहोचण्याचे बळ -रहाणे

साउदम्पटन : टीकेनेच इथपर्यंत पोहोचण्याचे बळ दिले, अशी प्रतिक्रिया भारताचा कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने व्यक्त केली. लोकांच्या टीकेची पर्वा न करता भारताच्या कसोटी विजयांत महत्त्वाच्या योगदानाचे रहाणेचे कार्य सुरू आहे.

दोन वर्षांच्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अभियानात रहाणेने १७ सामन्यांत १०९५ धावा केल्या असून, भारताचा तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. आघाडीवर असल्याची भावना खास आहे, असे रहाणेने सांगितले. धावा पुरेशा न झाल्यावर सामोरे जावे लागलेल्या टीकेबाबत रहाणे म्हणाला, ‘‘टीकेला मी आनंदाने सामोरा जातो. टीकेमुळे मी इथपर्यंत पाहोचू शकलो, असे मला वाटते. लोकांनी टीका करो अथवा न करो, आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यातच मला धन्यता वाटते. देशासाठी फलंदाज आणि क्षेत्ररक्षक म्हणून सर्वोत्तम कामगिरी करीत राहणेच मला महत्त्वाचे वाटते.’’

कसोटी क्रमवारीत कोहली चौथ्या स्थानी

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहलीने पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानी मुसंडी मारली आहे. याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने पुन्हा अग्रस्थान गाठण्याची किमया साधली आहे. फलंदाजांच्या क्रमवारीतील अव्वल १० जणांमध्ये भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत (७४७ गुण) आणि सलामीवीर रोहित शर्मा (७४७ गुण) संयुक्तपणे सहाव्या स्थानावर आहेत. केन विल्यम्सनचे अग्रस्थान स्मिथने काबीज केले आहे.