भारतीय कर्णधार विराट कोहली हा आक्रमक क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो. मैदानात प्रतिस्पर्धी संघाच्या ‘आरे ला कारे’ करण्यासाठी तो कायम तयार असतो. सुरुवातीच्या काळात विराटच्या या आक्रमक स्वभावावर टीका करण्यात आली होती, पण हळूहळू तो कर्णधार म्हणून परिपक्व झाला. गेले काही वर्षे विराट भारतीय संघ आणि IPL मध्ये RCB च्या संघाची धुरा सांभाळतो आहे. भारताने विराटच्या नेतृत्वाखाली उल्लेखनीय कामगिरी केली आहे, पण बंगळुरूच्या संघाला अद्याप अपेक्षित यश मिळालेले नाही. यामागचं काय कारण आहे? याबद्दल माजी फलंदाज आणि समालोचक आकाश चोप्रा याने मत व्यक्त केलं आहे.

आपल्या यू ट्युब चॅनेलवरून आकाश चोप्रा याने विराटची पाठराखण केली. आकाश म्हणाला, “विराट हा नक्कीच यशस्वी IPL कर्णधार नाही. पण खरी गोष्ट म्हणजे संघाच्या कामगिरीमुळे त्याच्या पदरी अपयश येत आहे. केवळ एक-दोन वर्षे नाही, तर अनेक हंगाम संघातील खेळाडूंच्या वाईट कामगिरीमुळे विराटचं नेतृत्व प्रभावी होऊ शकत नाहीये. RCB च्या अपयशामागचं एक कारण म्हणजे संघातील खेळाडूंची निवड. जर तुम्ही त्यांचा खेळाडूंचा चमू पाहिलात तर तुम्हाला काही महत्त्वाच्या चुका दिसतील आणि त्याच चुकांचा प्रतिस्पर्धी संघ अनेक हंगाम गैरफायदा घेतो आहे.”

“मोक्याच्या क्षणी भेदक मारा करत धावा वाचवणारे वेगवान गोलंदाज त्यांच्या संघात नाहीत. पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणारे फलंदाजही त्यांच्याकडे नाहीत. पण त्यांनी या समस्यांचा कधीच विचार केला नाही. त्यांच्याकडे वरच्या फळीतील फलंदाज दमदार आहेत. युजवेंद्र चहल, एखादा वेगवान गोलंदाज असा त्यांता संघ आहे. जर तुम्ही संघातील खेळाडूंची निवड नीट केली नाहीत, तर कर्णधाराकडून चमत्काराची अपेक्षा करू नका”, असे त्याने स्पष्ट केलं.