वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने राजकोट कसोटीत पाहुण्या विंडीज संघावर डावाने मात करत मालिकेची धडाक्यात सुरुवात केली आहे. भारताने १ डाव आणि २७२ धावांची सामना जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचा संघ १९६ धावांमध्ये आटोपला. भारताकडून दुसऱ्या डावात कुलदीप यादवने ५, रविंद्र जाडेजाने ३ तर रविचंद्रन आश्विन २ विकेट घेतल्या. या मालिकेतला दुसरा सामना १२ ऑक्टोबरपासून हैदराबाद येथे सुरु होणार आहे. राजकोट कसोटीच्या तिसऱ्या दिवशी तब्बल ५ विक्रमांची नोंद करण्यात आली.

अवश्य वाचा – Ind vs WI : पहिलं शतक आईला समर्पित – रविंद्र जाडेजा

१ – कसोटी, वन-डे आणि टी-२० या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये ५ बळी घेणारा कुलदीप यादव पहिला डावखुरा फिरकीपटू ठरला आहे. याचसोबत इम्रान ताहीर आणि अजंता मेंडीस यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा कुलदीप तिसरा फिरकीपटू ठरलाय.

२ – घरच्या मैदानावर भारताला सर्वाधिक विजय मिळवून देणाऱ्या कर्णधारांच्या यादीत विराट कोहली दुसऱ्या स्थानावर. विराटने भारताला १४ विजय मिळवून दिले आहेत. सध्या महेंद्रसिंह धोनी २१ विजयांसह पहिल्या स्थानावर आहे.

६ – पदार्पणाच्या सामन्यात सामनावीराचा किताब मिळवणारा पृथ्वी शॉ सहावा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी प्रविण आमरे, आर.पी.सिंह, रविचंद्रन आश्विन, शिखर धवन, रोहित शर्मा यांनी अशी कामगिरी केली आहे.

१०० – भारतीय संघाचा घरच्या मैदानावरचा हा शंभरावा विजय ठरला. अशी कामगिरी करणारा भारत चौथा संघ ठरला आहे.

२७२ – विंडिजवर १ डाव आणि २७२ धावांनी मिळवलेला विजय हा भारताचा कसोटी क्रिकेटमधला सर्वात मोठा विजय ठरला आहे. याआधी भारताने अफगाणिस्तानला बंगळुरु कसोटीत १ डाव २६२ धावांनी हरवलं होतं.