मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जमधील पहिल्या क्वालिफायर सामन्याला काही तासांमध्ये सुरुवात होणार आहे. बाद फेरीचे गणित कठीण असतानाही मुंबई इंडियन्सने लागोपाठ दोन सामने जिंकून थेट अग्रस्थानी झेप घेतली. आता तीन वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई यांच्यात रंगणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नईला घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा होणार असला तरी मुंबईचा झंझावात ते रोखू शकतील का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. या सामन्यामधील नाणेफेक कोण जिंकतो यापासून सामन्यावर कोणाचे वर्चस्व राहणार याबद्दलच्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. असे असतानाच आयआयटी मद्रासमधील एका पेपरमध्ये आजच्या सामन्याआधी नाणेफेक जिंकल्यावर धोनीने फलंदाजी घ्यावी की गोलंदाजी असा प्रश्न विचारला आहे. आयसीसीच्या फेसबुकपेजवरुन पेपरमधील या प्रश्नाचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे.

आयआयटी मद्रासमधील मटेरियल अॅण्ड एनर्जी बॅलेन्स या विषयावरील पेपरमध्ये चेन्नई विरुद्ध मुंबई सामन्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला आहे. काल म्हणजेच ६ मे रोजी सकाळी नऊ वाजता घेण्यात आलेल्या पेपरमध्ये हवामानाचा अंदाज, हवेतील आद्रता, तापमान या सर्वांची माहिती देण्यात आली असून या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यास धोनीने नाणेफेक जिंकल्यावर फलंदाजी घ्यावी की गोलंदाजी असा प्रश्न विद्यार्थ्यांना विचारण्यात आला आहे. ‘खऱ्या आयुष्यातील प्रश्नांना परिक्षेमधील पेपरमध्ये विचारणाऱ्या आयआयटी मद्रासमधील प्रोफेसर विग्नेश यांचे अभिनंदन. नाणेफेक होण्याआधी तुम्ही धोनीला आणि चेन्नईच्या संघाला हा महत्वाचा निर्णय घेण्यासाठी मदत करु शकता का?’, असा प्रश्न आयसीसीने या पोस्टमध्ये विचारला आहे.

अनेकांनी या पोस्टखाली कमेंट करुन या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. अनेकांनी सर्व परिस्थिती लक्षात घेता धोनीने नाणेफेक जिंकल्यानंतरही प्रथम गोलंदाजीचा निर्णय घ्यायला हवा असं म्हटलं आहे.

दरम्यान, साखळीतील दोन्ही सामन्यांत मुंबईने चेन्नईवर सहजपणे सरशी साधली होती. त्यामुळे या सामन्यातही विजय मिळवून थेट अंतिम फेरीत मजल मारण्याकडे मुंबईचे लक्ष लागले आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईने दमदार सुरुवात करत गुणतालिकेवर निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. त्यानंतर त्यांना दिल्ली कॅपिटल्सने मागे टाकले. अखेरच्या सामन्यात मुंबईने विजय मिळवत चेन्नईकडून अग्रस्थान हिसकावून घेतले. आता बाद फेरीतील पहिल्या सामन्यात चेन्नईसमोर आयपीएल सर्वात कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या मुंबईशी गाठ पडणार आहे. एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर चेन्नईने शानदार कामगिरी केली असून यंदाच्या मोसमात त्यांनी सातपैकी सहा लढती जिंकल्या आहेत. याचाच फायदा उठवण्याचा प्रयत्न चेन्नई संघ करणार आहे. पहिल्या क्वालिफायर सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाला अंतिम फेरी गाठण्याची दुसरी संधी १० मे रोजी होणाऱ्या क्वालिफायर-२ सामन्याद्वारे मिळणार आहे.

चेन्नईच्या आघाडीच्या फळीने साखळी फेरीच्या पहिल्या टप्प्यात अप्रतिम फलंदाजीचे प्रदर्शन केले होते. मात्र जसप्रीत बुमरा (१७ बळी), लसिथ मलिंगा (१५ बळी), हार्दिक पंडय़ा (१४), कृणाल पंडय़ा (१०) आणि लेगस्पिनर राहुल चहल (१० बळी) या बलाढय़ मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीला सामोरे जाताना त्यांना आपली कामगिरी उंचवावी लागणार आहे. कर्णधार धोनीने चेन्नईकडून सर्वाधिक ३६८ धावा (३ अर्धशतके) फटकावल्या असून त्याच्यावरच यजमानांच्या फलंदाजीची मुख्य भिस्त असणार आहे. शेन वॉटसन, फॅफ डय़ू प्लेसिस आणि सुरेश रैना यांच्यासह अंबाती रायुडूकडूनही चेन्नईला भरीव कामगिरीची अपेक्षा असेल. चेन्नईला मात्र अनुभवी केदार जाधवची उणीव भासणार आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात केदारचा खांदा दुखावल्यामुळे बाद फेरीतील त्याच्या समावेशाविषयी साशंकता निर्माण झाली आहे. चेन्नईला आतापर्यंत गोलंदाजांनी तारले असून इम्रान ताहिरने त्यांच्या यशात मोलाचा वाटा उचलला आहे. त्याचबरोबर हरभजन सिंग आणि रवींद्र जडेजा (प्रत्येकी १३ बळी) हेसुद्धा चेन्नईसाठी उपयुक्त योगदान देत आहेत. मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीची मदार कर्णधार रोहित शर्मा (३८६ धावा), क्विंटन डी’कॉक (४९२), हार्दिक पंडय़ा (३८०) आणि किरॉन पोलार्ड यांच्यावर असणार आहे. मात्र चेपॉकच्या धिम्या गतीच्या खेळपट्टीवर चेन्नईच्या अनुभवी फिरकी त्रिकुटाचा सामना करताना मुंबईच्या अव्वल फलंदाजांना सावध खेळी करावी लागणार आहे. मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी चेन्नईला कमी लेखण्याची चूक करणार नसल्याचे म्हटले आहे.

मुंबई आणि चेन्नईने प्रत्येकी तीन वेळा आयपीएलच्या जेतेपदावर नाव कोरले आहे. मुंबईने २०१३, २०१५ व २०१७ मध्ये तर चेन्नईने २०१०, २०११ व २०१८ मध्ये विजेतेपदाची किमया साधली आहे. १५ मुंबई आणि चेन्नई यांच्यात आतापर्यंत २६ लढती झाल्या असून मुंबईने १५ सामन्यांत तर चेन्नईने ११ सामन्यांत बाजी मारली आहे. मुंबईने यंदाच्या मोसमात चेन्नईविरुद्धच्या दोन्ही लढती जिंकल्या आहेत.