ताश्कंद (उझबेकिस्तान) : कम्पाऊंड प्रकारातील भारतीय तिरंदाजांनी दुसऱ्या आशियाई चषक जागतिक मानांकन तिरंदाजी स्पर्धेत ५ सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्य अशी १० पदके मिळवून निर्विवाद वर्चस्व राखले. रीकव्र्ह प्रकारात २ सुवर्ण आणि तीन रौप्यपदके पटकावून भारताने या टप्प्यात एकूण १४ पदकांची कमाई केली.
स्पर्धेत एकूण दहा सुवर्णपदकांचा निर्णय लागला. रीकव्र्ह प्रकारात भारतीय तिरंदाजांना तीन अंतिम फेरीत अपयश आल्याने स्पर्धेतील सुवर्णपदके मिळवण्यापासून भारतीय संघ दूर राहिला. ही तीनही सुवर्णपदके चीनने पटकावली. यानंतरही बलाढय़ कोरियाच्या गैरहजेरीत भारताने पदकतालिकेत आघाडीचे स्थान राखले.
रीकव्र्हच्या वैयक्तिक प्रकारात पुरुष विभागात भारताच्या मृणाल चौहानला वँग बाओबीनकडून २-६ असा पराभव पत्करावा लागला. महिला विभागात संगीताला वू जियाझिनकडून १-३ अशी हार पत्करावी लागली. संगीता, मधून वेदवान, तनिशा वर्मा या संघाला रिकव्र्ह सांघिकचेही सुवर्णपदक गमवावे लागले. चीनच्या संघाने भारतीय संघाचा ५-१ असा पराभव केला. मिश्र दुहेरीत मृणाल आणि संगीताने चीनच्या जोडीवर ५-४ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला.
ऑलिम्पिक प्रकार नसलेल्या कम्पाऊंड विभागात परणीत कौर, रजनी मार्को, प्रगती या तिघींनी सांघिक सुवर्ण मिळवताना कझाकस्तानच्या संघावर २३१-२२३ असा विजय मिळवला. अभिषेक वर्मा, कुशल दलाल, अमित या पुरुष संघाने हाँगकाँगचा २३३-२२६ असा पराभव केला. वैयक्तिक प्रकारात रजनीने आपली सहकारी प्रगतीचा १४४-१४४ अशा बरोबरीनंतर ‘शूट-ऑफ’मध्ये पराभव केला. परणीतने कझाकस्तानच्या अदेल हेझेनबिनोवाचे आव्हान १४३-१४१ असे संपुष्टात आणून कांस्यपदक पटकावले. पुरुषांच्या वैयक्तिक प्रकारात अभिषेकने आपलाच सहकारी अमितचा १४३-१४३ अशा बरोबरीनंतर ‘शूट-ऑफ’मध्ये पराभव केला.