वृत्तसंस्था, कोलकाता
फुटबॉलच्या मैदानावर भारतीय संघाकडून होणाऱ्या निराशेनंतर माजी कर्णधार बायचुंग भुतियाने तीव्र नाराजी व्यक्त केली. संघटनात्मक पातळीवर संपूर्ण कायापालट होत नाही, तोपर्यंत भारतीय फुटबॉलची अधोगती अशीच सुरू राहील, असे परखड मतही बायचुंगने व्यक्त केले आहे. जागतिक क्रमवारीत १२७व्या स्थानी असणाऱ्या भारतीय संघाला आशियाई चषक पात्रता फेरीच्या सामन्यात क्रमवारीत १५३व्या स्थानी असणाऱ्या हाँगकाँगकडून लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर संघाच्या कामगिरीवर बरीच टीका होत आहे. मात्र, गेल्या काही काळात भारतीय संघाला येत असलेल्या अपयशाला केवळ खेळाडूंना जबाबदार धरता येणार नाही, असे बायचुंगला वाटते.
‘‘भारतीय फुटबॉलची सध्याची स्थिती पाहून फार दु:ख होते. पूर्वी आपला संघ सातत्याने आशियाई चषकात खेळायचा. मात्र, आता आपल्याला पात्रतेसाठीही झगडावे लागत आहे. उझबेकिस्तान, इंडोनेशिया आणि जॉर्डन यांसारखे देश विश्वचषकासाठी पात्र ठरत असताना आपल्याला आशियाई स्पर्धेत खेळण्यासाठीही इतका संघर्ष करावा लागत आहे, हे अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायक आहे,’’ असे बायचुंग म्हणाला.
भारताची २०२७च्या आशियाई चषकासाठीची पात्रता धोक्यात आली आहे. भारतीय फुटबॉलची सध्याची स्थिती अतिशय चिंताजनक असल्याचे सांगतानाच बायचुंगने राष्ट्रीय संघटना ‘एआयएफएफ’चे अध्यक्ष कल्याण चौबे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ‘‘चौबे यांच्यामुळे सध्याची स्थिती निर्माण झाली आहे. अडीच वर्षांत संघटनेत तीन सरचिटणीस होऊन गेले. आता परिस्थितीत सुधारणा करायची झाल्यास संघटनात्मक पातळीवर संपूर्ण कायापालट हाच एकमेव पर्याय आहे,’’ असे बायचुंग म्हणाला.
प्रशिक्षक निवडीवरही टीका
तांत्रिक समितीच्या शिफारशींकडे काणाडोळा करून मानोलो मार्क्वेझ यांची प्रशिक्षकपदी निवड करण्यावरूनही बायचुंगने चौबे यांच्यावर टीका केली. मार्क्वेझ एकाच वेळी भारतीय संघ आणि इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) संघ एफसी गोवाचे प्रशिक्षकपद भूषवत आहेत हे योग्य नसल्याचे बायचुंग म्हणाला. तसेच युवा खेळाडूंना संधी देऊन त्यांना सर्वोच्च स्तरावरील फुटबॉलसाठी तयार करण्यापेक्षा मार्क्वेझ यांनी ४० वर्षीय सुनील छेत्रीला आंतरराष्ट्रीय निवृत्ती मागे घेण्यासाठी विनंती केली हे अतिशय वाईट असल्याचेही बायचुंगने नमूद केले.
‘‘प्रशिक्षकांच्या विनंतीवरून सुनीलने निवृत्ती मागे घेतली हा त्याचा मोठेपणा झाला, परंतु प्रशिक्षकांनी त्याला विनंती करण्याची गरजच काय होती? नवे खेळाडू तयार करण्याची तुमच्यात क्षमता नाही का? संघटनेनेही त्याच्यावर दडपण आणल्याचे आता ऐकायला मिळत आहे. मात्र, सुनील पुन्हा संघात आल्याने खरेच फायदा झाला आहे का?’’ असे प्रश्न बायचुंगने उपस्थित केले.
अतिरिक्त रक्कम कशासाठी?
आशियाई चषक पात्रता फेरीतील हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यास खेळाडूंना ४२ लाख रुपयांचा बोनस देण्याचा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) निर्णय घेतला होता. यावरही बायचुंगने टीका केली. ‘‘तुम्ही एका सामन्यासाठी ४२ लाख रुपये देणार? ही अतिरिक्त रक्कम संपूर्ण पात्रतेसाठी नको का? या एका निर्णयावरूनही ‘एआयएफएफ’ला खेळाबद्दल किती समज आहे हे लक्षात येते,’’ असे बायचुंग म्हणाला.