भारत आणि इंग्लंड यांच्यात ओव्हल कसोटी सामन्यात खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात रोहित शर्माला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. या सामन्याच्या पहिल्या डावात रोहित शर्माने फक्त ११ धावा केल्या होत्या, पण दुसऱ्या डावात त्याने १२७ धावा केल्या आणि टीम इंडियाला मोठ्या धावसंख्येकडे नेण्यात मोठी भूमिका बजावली. रोहितला त्याच्या शतकी खेळीसाठी सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले, परंतु पुरस्कार समारंभात शार्दुलबाबत एक प्रतिक्रिया देत सर्वांची मने जिंकली आहेत.

सामनावीर म्हणून घोषित झाल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, ”माझ्यापेक्षा शार्दुल ठाकूर या पुरस्काराला पात्र होता. मला मैदानावर अधिकाधिक वेळ घालवायचा होता. दुसरा डाव खास होता आणि माझ्यासाठी हे शतकही खास होते. विराटने केवळ फलंदाजांच्या प्रयत्नाचे कौतुक केले, पण एक संघ म्हणून ते खूप महत्वाचे होते. मला आनंद आहे की माझ्या खेळीमुळे मी संघाला चांगल्या स्थितीत नेऊ शकलो. तिसऱ्या शतक करणे माझ्या मनात नव्हते. फलंदाजांवर दबाव होता आणि आम्ही परिस्थितीनुसार फलंदाजी केली. मला सलामी देण्याचे महत्त्व माहित आहे आणि योगदान दिल्याचा मला आनंद आहे.”

 

हेही वाचा – शार्दुल नवा रजनीकांत?; हर्षा भोगले म्हणतात, ‘‘तो तर हाताच्या इशाऱ्यानेच पालघरची…”

या सामन्यात शार्दुल ठाकूरची कामगिरी खूप चांगली होती. विशेषत: त्याने दोन्ही डावांमध्ये ज्या प्रकारे फलंदाजी केली ते कौतुकास्पद होते. त्याने पहिल्या डावात५८ धावा केल्या, तर दुसऱ्या डावात त्याने ६० धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. गोलंदाजीत त्याने पहिल्या डावात एक विकेट आणि दुसऱ्या डावात दोन विकेट घेतल्या.

ओव्हल मैदानावर आशियाई खेळाडू म्हणून, पाकिस्तानचा युनूस खान आणि रोहित शर्मा यांनी सामनावीराचा पुरस्कार पटकावला आहे.