भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ४  सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूर येथे पार पडला. पाच दिवसांचा कसोटी सामना भारताने तिसऱ्याच दिवशी खिशात घातला. या सामन्यात भारताने एक डाव आणि १३२ धावांनी विजय साकारला. या विजयात भारतीय गोलंदाजांनी सिंहाचा वाटा उचलला. विशेष म्हणजे, भारतीय संघाने हा सामना जिंकत कसोटी मालिकेत १-०ने आघाडी घेतली. सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना संघातील अनेक मजेशीर कहाण्या सांगितल्या.

सामना संपल्यानंतर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना भारताचा कर्णधार रोहित शर्माला सूत्रसंचालक जतीन सप्रूने संवाद साधण्यासाठी आमंत्रित केले. त्यावेळी हिटमॅनने भारताचे दोन माजी खेळाडू इरफान पठाण आणि दीप दास गुप्ता यांच्या अनेक प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली. सर्वात आधी त्याला टीम इंडियाचा कर्णधार होण या विषयी विचारण्यात आले. यावर रोहित म्हणतो की. “भारतात तरी कॅप्टन्सी करणे एवढे सोपे नाही. कारण तीन-तीन स्पिनर सांभाळणे हे काय खायचं काम नाही. प्रत्येकजण म्हणतो स्वतःचे विक्रम पूर्ण व्हावेत यासाठी गोलंदाजी मागत असतो. अश्विन म्हणतो आज माझा ४५० विकेट्सचा नवीन विक्रम होणार आहे तर मला आधी गोलंदाजी दे. तिकडे जडेजा म्हणजेच जड्डू म्हणतो की माझे २५० विकेट्स होणार आहेत तर मला आधी गोलंदाजी करायची आहे. मागे पण श्रीलंकेच्या एकदिवसीय मालिकेत सिराजने २२ पैकी १० षटके टाकून पाच गडी (5 wicket hall) पूर्ण व्हावेत यासाठी अक्षरशः नॉन स्टॅाप गोलंदाजी केली आणि त्याला म्हटलं की पुढे मोठी कसोटी मालिका आहे थोडा श्वास घे.”

त्यानंतर भारताचा माजी डावखुरा गोलंदाज इरफान पठाण याने रोहितला प्रश्न विचारला की, “जिथे जलदगती गोलंदाज गोलंदाजी करून पायाचे फूटमार्क पडतात अशा बाजूने गोलंदाजी करण्यासाठी तिनही स्पिनर आज सकाळी पळाले का?” यावर कर्णधाराने उत्तर दिले, “सगळेजण त्याच बाजूने गोलंदाजी करण्यासाठी धावले होते. शेवटी मी त्यांना सांगितले की जोपर्यत डावखुरा फलंदाज आहे तोपर्यत अश्विन त्याबाजूने गोलंदाजी करेन. नंतर उजव्या हाताचा फलंदाज येईल त्यावेळी अक्षर आणि जडेजा गोलंदाजी करतील. त्यामुळे बाहेरच्या दबावापेक्षा यांना सांभाळणे जास्त कठीण आहे. त्यात कुलदीप बाहेर बसला आहे, तो तर मला फाडून खाईल.” यावर एकाच हशा पिकला.

भारतीय संघाने नागपूर कसोटीत वर्चस्व गाजवले. भारताने खेळपट्टी त्यांच्यासाठी पोषक बनवल्याचा आरोप ऑस्ट्रेलियाकडून झाला. फिरकीपटूंना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर भारताने धावांचा डोंगर उभारून या आरोपांचा पार चुराडा केला. रवींद्र जडेजा, आर अश्विन यांच्या फिरकीसमोर ऑसी फलंदाज पार बेजार झाले. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १७७ धावांवर गुंडाळल्यानंतर भारताने ४०० धावा करून २२३ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी सुरूच राहिली आणि भारताने अडीच दिवसांत कसोटी जिंकली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहितच्या आजवरच्या कारकिर्दीचा विचार केल्यास त्याने ९ कसोटी शतके,‌‌ ३० वन डे शतके व‌ ४ शतके झळकावली आहेत. सध्या सक्रिय क्रिकेटपटूंमध्ये तो विराट कोहलीनंतर सर्वात जास्त शतके ठोकणारा खेळाडू आहे. विराटने आत्तापर्यंत ७३ शतके आपल्या नावे केली आहेत.