काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने दहशतवाद्यांना आर्थिक पुरवठा केल्या प्रकरणी दोषी ठरवले आहे. यासीन मलिकने दोन आठवड्यांपूर्वी सर्व आरोप स्वीकारले आहेत. मात्र असं असलं तरी यासिन मलिकच्या समर्थनार्थ पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात गरळ ओकली आहे. ट्विटरवरुन आफ्रिदीने यासिन मलिकविरोधातील हे प्रकरण बनावट असल्याचे आरोप केले आहेत. तसेच त्याने या प्रकरणामध्ये थेट संयुक्त राष्ट्रांनी दखल द्यावी अशी मागणीही केलीय. मात्र भारताविरोधातील आफ्रिदीच्या या वक्तव्यवारुन भारताचा फिरकीपटू अमित मिश्राने एक भन्नाट उत्तर देत आफ्रिदीला टोला लगावलाय.

प्रकरण काय?
यासीन मलिकने दोन आठवड्यांपूर्वी सर्व आरोप स्वीकारल्यानंतर या प्रकरणामध्ये आज न्यायालय अंतिम निकाल सुनावणार आहे. मलिकवर गुन्हेगारी कट रचणे, देशाविरुद्ध युद्ध पुकारणे, इतर बेकायदेशीर कारवाया आणि काश्मीरमधील शांतता भंग केल्याचे आरोप सिद्ध झाले आहेत. जम्मू-काश्मीर फुटीरतावादी नेता मोहम्मद यासिन मलिकने दिल्ली एनआयए कोर्टात दहशतवादाशी संबंधित सर्व गुन्ह्यांची कबुली दिली आहे. मलिक याच्यावर दिल्ली उच्च न्यायालयात बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा (यूएपीए) यासह दहशतवादाशी संबंधित अनेक खटले दाखल आहेत. मलिकवर भारतीय दंड संहितेच्या कलम १६ (दहशतवाद कायदा), कलम १७ (दहशतवादासाठी निधी), कलम १८ (दहशतवादाचा कट रचणे) आणि कलम २० (दहशतवादी टोळीचा सदस्य) असे आरोप ठेवण्यात आले आहेत. यासोबतच त्याच्यावर UAPA, १२०बी (गुन्हेगारी कट) आणि १२४ ए (देशद्रोह) आरोप लावण्यात आले आहेत.

विशेष न्यायाधीश प्रवीण सिंह यांच्यासमोर या प्रकरणाची १९ मे रोजी अंतिम सुनावणी झाल्यानंतर आज या प्रकरणात यासिनला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. असं असतानाच हा अंतिम निकाल लागण्याआधी या प्रकरणात आफ्रिदीने उडी घेतली.

आफ्रिदी काय म्हणाला?
निकाल येण्याआधीच आफ्रिदीने काश्मीरमधील संघर्षावर भाष्य करताना भारताला लक्ष्य केलंय. “मानवी हक्कांच्या निर्घृण उल्लंघनाविरुद्ध टीकात्मक आवाज शांत करण्याचे भारताचे सततचे प्रयत्न व्यर्थ आहेत. काश्मीरमध्ये स्वातंत्र्यासाठी सुरु असणारा संघर्ष यासिन मलिकविरोधातील खटल्यांमुळे थांबणार नाही. काश्मीरी नेत्यांविरोधात अशाप्रकारे अयोग्य पद्धतीने बेकायदेशीररित्या सुरु असणाऱ्या प्रकरणांची संयुक्त राष्ट्रांना दखल घ्यावी असं मी आवाहन करतो,” असं ट्विट आफ्रिदीने केलं आहे. आफ्रिदीने या ट्वटमध्ये पाकिस्तानात काश्मीरी संघर्षाचं प्रतिक असणारा झेंडा गच्चीवर फडकवतानाचा स्वत:चा फोटोही पोस्ट केलाय.

अमित मिश्राचं भन्नाट उत्तर
भारताविरोधात वक्तव्य करणाऱ्या आफ्रिदीच्या या वक्तव्यावर अमित मिश्राने रिप्लाय दिलाय. “प्रिय शाहिद आफ्रिदी हा स्वत: न्यायालयामध्ये दोषी आढळला आहे. सर्व काही तुझ्या जन्मतारखेप्रमाणे फसवणूक करणारं नसतं,” असं ट्विट मिश्राने आफ्रिदीचं ट्विट कोट करुन रिट्विट करत केलंय.

आफ्रिदीच्या वयाचा वाद काय?
शाहिद आफ्रिदीने ३७ चेंडूंमध्ये शतक ठोकलं तेव्हा तो १६ वर्षांचा होता असा दावा करण्यात आलेला. मात्र हा दावा खोटा असल्याचं नंतर उघड झालं. आफ्रिदीनेचे त्याच्या गेम चेंजर या पुस्तकामध्ये यासंदर्भात खुलासा केलाय. “मी तेव्हा १९ वर्षांचा होतो मात्र त्यांनी मी १६ वर्षाचा असल्य्चा दावा केला. माझा जन्म १९७५ मध्ये झालाय. त्यामुळे अधिकाऱ्यांनी माझ्या वयाची चुकीची नोंद केलीय,” असं आफ्रिदी पुस्तकात म्हणालाय.

दरम्यान, आफ्रिदीच्या यासिनच्या समर्थन करणाऱ्या या ट्विटवरुन त्याच्यावर भारतीयांनी टीकेची झोड उठवली आहे. अशाप्रकारे न्यायालयीन वादांसंदर्भात आणि खास करुन भारत पाकिस्तान वादाबद्दल आफ्रिदेने भाष्य करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्याने अशाप्रकारची वायफळ बडबड केल्याची उदाहरणे आहेत.