ICC T20 World Cup 2022: १६ ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या आयसीसी टी२० विश्वचषकात सुपर-१२चे सामने हे २२ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. २३ ऑक्टोबरला भारत व पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. मागील विश्वचषकात पाकिस्तानने दहा गडी राखून भारताला मोठ्या फरकाने पराभूत केले होते. आशिया चषकाच्या पहिल्या सामन्यात भारताने हा बदला पूर्ण केला. पण पुन्हा आशिया चषक क्वालिफायरमध्ये पाकिस्तानने भारताला हरवल्याने आता टीम इंडियासाठी विजय मिळवणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. दुखापतीमुळे आशिया चषकातून बाहेर असलेला शाहीन आफ्रिदी आता ठणठणीत होऊन विश्वचषकात पुनरागमन करणार आहे. भारतासाठी आफ्रिदी हा मोठा धोका ठरू शकतो म्हणूनच भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने संघाला काही खास टिप्स दिल्या आहेत.

पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने मागील विश्वचषकात भारताच्या तीन खेळाडूंना तंबूत धाडले होते, त्याला याच सामन्यात सामनावीर म्हणून गौरवण्यात आले होते. जर भारताला यंदा या पराभवाची पुनरावृत्ती टाळायची असेल तर शाहीन आफ्रिदीच्या सुरुवातीच्या खेळीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे असे सचिन तेंडुलकरने सांगितले आहे. कर्णधार रोहित शर्मा व के. एल.राहुल यांना शाहीनच्या गोलंदाजीवर कसं टिकून राहायचं यावर सचिनने मार्गदर्शन केले.

सचिनने सांगितले की, रोहित व राहुल दोघांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या धावा केल्या आहेत आणि ते दोघेही सक्षम आहेत त्यामुळे शाहीनला कसे सामोरे जायचे हे त्यांनीही ठरवलेच असणार, शाहीन आफ्रिदीला बॉल वर उचलून आधी मागे व मग मग थ्रो करण्याची सवय आहे. आफ्रिदी एक आक्रमक गोलंदाज आहे, त्याचा सामना करायचा असेल तर भारतीय फलंदाजांनी सुरुवातीला थोडं सांभाळून खेळणं गरजेचे आहे. जरी बॉल स्विंग होत आहे असे वाटत असेल तरीही तो सरळच येणार असतो हे नेहमी लक्षात ठेवा.

Asia Cup 2023 पाकिस्तानात घेतला तर टीम इंडिया.. BCCI चे सचिव जय शाह स्पष्टच बोलले

दरम्यान, सोमवारी गाबा येथे शाहीन आफ्रिदीचे आक्रमक रूप पाहायला मिळाले. शादाब खानने 160 धावांचा बचाव करत असताना शाहीनला सुरुवातीची ओव्हर दिली. अलीकडेच दुखापतीतून बरा झालेल्या आफ्रिदीचा वेग थोडा कमी झाला होता पण त्याने स्विंगमध्ये बरेच बदल केले आहेत. येत्या २३ ऑक्टोबरला भारतासमोर आफ्रिदीचा खेळ भाव खाऊन जाणार की भारतीय फलंदाज आक्रमक आफ्रिदीचा सामना करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.