टी२० विश्वचषक २०२२ मधील सुपर-१२ मधील तिसरा सामना भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघात मेलबर्न येथे संपन्न झाला. भारतीय संघ टी२०विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत अगोदरच पोहचला असून झिम्बाब्वेविरुद्धचा सामना केवळ औपचारिकता होती. पण गटातील अव्वलस्थान कायम राखण्यासाठी टीम इंडियाला हा विजय आवश्यक होता आणि त्यांनी तो मिळवला. टी२० विश्वचषकातील अखेरच्या साखळी सामन्यात भारतीय संघाने झिम्बाब्वेवर ७१ धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीत थाटात प्रवेश केला. सूर्यकुमार यादवची झंझावती खेळी आणि लोकेश राहुलच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने तगडे लक्ष्य उभे केले. त्यानंतर गोलंदाजांनी त्यांची जबाबदारी चोख पार पाडली.

भारताविरुद्ध झिम्बाब्वे सामना सुरु असताना एक विचित्र घटना घडली. झिम्बाब्वेची फलंदाजी सुरु असताना आणि अश्विन षटक टाकत होता त्यावेळी टीम इंडियाच्या एका अतिउत्साही चाहत्याने थेट मैदानात एन्ट्री केली आणि तो थेट विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना भेटायला गेला. त्यानंतर मैदानावरील सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण तो तरीही त्याने रोहितशी हात मिळवलाच. शेवटी रोहितने दिलदारपणा दाखवत सुरक्षा रक्षकांना विनंती केली आणि म्हणाला की, “ त्याला सोडून द्या.” हाच दिलदारपणा त्याचा सर्वांना भावला आणि सध्या तो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यासर्व प्रकारामुळे सामना काहीवेळ थांबविण्यात आला होता.

भारताने या विजयासह ग्रुप २ मध्ये ८ गुणांसह अव्वल स्थान कायम राखले. उपांत्य फेरीत त्यांच्यासमोर इंग्लंडचे आव्हान असणार आहे. भारताने झिम्बाब्वेसमोर १८७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २० षटकांत ५ गडी गमावून १८६ धावा केल्या.आजच्या सामन्यात भारतीय संघात दिनेश कार्तिक ऐवजी ॠषभ पंतला संधी देण्यात आली. सलामीला आलेला कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. तो केवळ १५ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीने केएल राहुलसोबत ६० धावांची भागीदारी करत मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा :  IND vs ZIM: झिम्बाब्वेविरुद्धच्या विजयानंतर ‘ग्रुप टू’मध्ये भारतच नंबर वन; उपांत्य फेरीत इंग्लंडशी भिडणार! 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

झिम्बाब्वेकडून गोलंदाजी करताना चार गोलंदाजांना विकेट्स घेण्यात यश आले. शॉन विलियम्स याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने २ षटकात ९ धावा देत २ गडी बाद करण्याची कामगिरी केली. त्याच्याव्यतिरिक्त सिकंदर रझा, ब्लेसिंग्स मुझरबानी आणि रिचर्ड नगारवा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. उपांत्य फेरीतील टीम इंडियाचा सामना ऐतिहासिक अॅडलेड ओव्हल मैदानावर १० तारखेला होणार आहे. जर हा सामना पावसामुळे रद्द झाला तर भारत थेट अंतिम फेरीत पोहचेल.