इंग्लंडविरुद्धच्या कसोटी विजयानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे. या गोष्टीचा फायदा आम्हाला बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यामध्ये होईल, असे मत भारताचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी व्यक्त केले.
‘‘इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत प्रत्येक विभागाने चोख कामगिरी केली. त्यामुळे आमचा आत्मविश्वास उंचावला आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत आम्ही सातत्यपूर्ण कामगिरी केली. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही कामगिरीची हीच गती सातत्यपूर्ण ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,’’ असे कुंबळे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, ‘‘बांगलादेशविरुद्ध आम्हाला कोणतेही प्रयोग करण्याची गरज नाही, कारण आमच्याकडून चांगली कामगिरी होत आहे. जेव्हा चांगली कामगिरी होत असते तेव्हा कोणतेही प्रयोग करण्यापेक्षा कामगिरीत सातत्य राखण्यावर भर देणे महत्त्वाचे असते.’’
बांगलादेशच्या संघाबद्दल कुंबळे म्हणाले की, ‘‘बांगलादेशने गेल्या काही वर्षांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यांतही त्यांनी दिमाखदार कामगिरी केली होती. त्यामुळे त्यांना कमी लेखून चालणार नाही. बांगलादेशकडे बरेच गुणवान खेळाडू आहेत, त्यामुळे त्यांचा संघ कोणत्याही क्षणी सामन्यात पुनरागमन करू शकतो.’’
वीस बळी मिळवण्याची आमची क्षमता
भारतीय संघातील फिरकी गोलंदाजच चांगली कामगिरी करतात, असे म्हटले जाते; पण भारतातील खेळपट्टय़ा आणि वातावरण पाहता भारताच्या वेगवान गोलंदाजांनी गेल्या काही सामन्यांमध्ये भरीव कामगिरी केली आहे. वेगवान आणि फिरकी गोलंदाजांमध्ये योग्य समन्वय असल्यामुळे प्रतिस्पर्धी संघाचे वीस बळी मिळवण्याची आमची क्षमता आहे, असे कुंबळे यांनी सांगितले.
प्रत्येक सत्र महत्त्वाचे
कसोटी मालिका तीन किंवा पाच सामन्यांची असो, पण प्रत्येक सामन्यातील प्रत्येक सत्र महत्त्वाचे असते, कारण एका सत्रामध्ये सामन्याला कलाटणी मिळताना आपण पाहिले आहे. त्यामुळे प्रत्येक सत्र आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाबरोबर किती सामने आहेत, हे जास्त महत्त्वाचे ठरत नाही, असे कुंबळे म्हणाले.
करुणने संधीचे सोने केले
स्थानिक क्रिकेटमध्ये करुण नायर चांगली कामगिरी करत होता, पण त्याला भारतीय संघात स्थान मिळत नव्हते. पण जेव्हा त्याला भारतीय संघात स्थान मिळाले तेव्हा त्याने संधीचे सोने केले, असे कुंबळे यांनी सांगितले.
अजिंक्यला विसरून चालणार नाही
आतापर्यंत अजिंक्य रहाणेने भारतासाठी नेत्रदीपक कामगिरी केली आहे. बऱ्याच सामन्यांमध्ये दमदार खेळी साकारत त्याने संघाला विजयाचा मार्ग दाखवला आहे. तो काही दिवस दुखापतींनी त्रस्त होता, त्याचबरोबर गेल्या काही सामन्यांमध्ये त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही; पण यापुढे संघनिवडीचा विचार करताना अजिंक्यला विसरून चालणार नाही, असे कुंबळे म्हणाले.
कसोटी अव्वल मानांकनासाठी अश्विन व जडेजा यांच्यात चुरस
भारताचे फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा यांच्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट कसोटी मानांकनातील अव्वल स्थानासाठी चुरस आहे. बांगलादेशविरुद्ध गुरुवारपासून भारताचा एकमेव कसोटी सामना हैदराबाद येथे सुरू होत असून, त्यामध्ये हे खेळाडू कशी कामगिरी करतात याबाबत उत्सुकता असेल.
अश्विन हा सध्या अव्वल स्थानावर असून, जडेजा हा त्याच्याखालोखाल आठ गुणांनी दुसऱ्या स्थानावर आहे. जर जडेजाने या कसोटीत अश्विनपेक्षा जास्त चांगली कामगिरी केली तर तो अश्विनला मागे टाकू शकेल आणि अव्वल स्थानावर विराजमान होईल. भारताचे इशांत शर्मा व उमेश यादव हे वेगवान गोलंदाज अनुक्रमे २३व्या व ३७व्या स्थानावर आहेत. बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन हा सध्या १४व्या स्थानावर असून, या कसोटीद्वारे आपल्या मानांकनात सुधारणा करण्याची त्याला संधी आहे. मेहेदी हसन व तैजुल इस्लाम हे बांगलादेशचे गोलंदाज अनुक्रमे ३६व्या व ३९व्या स्थानावर आहेत.
फलंदाजीच्या क्रमवारीत विराट कोहली हा सध्या अव्वल स्थानावर असलेला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ याच्यापेक्षा ५८ गुणांनी पिछाडीवर आहे.