भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी२० सामना रविवारी (दि. २० नोव्हेंबर) रोजी माऊंट माऊंगनुई येथे खेळला गेला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ६५ धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताच्या या विजयाचा शिल्पकार सूर्यकुमार यादव ठरला. त्याला सामनीवीर म्हणून गौरवण्यात आले. यासह भारताने या मालिकेत १-०ने विजयी आघाडी घेतली. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा अक्षरश: घाम काढला. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याने धडाकेबाज शतकी खेळी करत टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारून दिली. धावांचा पाठलाग करताना १८.५ षटकात न्यूझीलंड केवळ १२६ धावाच करू शकली.

न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय भारतीय खेळाडूंनी प्राथमिकरीत्या चुकीचा ठरवला. यावेळी फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने निर्धारित २० षटकात ६ गडी गमावत १९१ धावा केल्या आणि न्यूझीलंडला १९२ धावांचे आव्हान दिले. यावेळी भारताकडून फलंदाजी करताना सूर्यकुमार यादव याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने या सामन्यात ५१ चेंडूत नाबाद १११ धावांची वादळी शतकी खेळी केली. या धावा करताना त्याने तब्बल ७ षटकार आणि ११ चौकारांचा पाऊस पाडला. त्याच्याव्यतिरिक्त फक्त ईशान किशन याने ३६ धावांचे योगदान दिले. तसेच, कर्णधार हार्दिक पंड्या आणि श्रेयस अय्यर यांनी प्रत्येकी १३ धावा केल्या. ऋषभ पंत ६ धावांवर तंबूत परतला. एका बाजूला सूर्या शतकी खेळी करून खेळपट्टीवर टिकून असताना भारताला एकापाठोपाठ एक धक्के देत टीम साउथीने हॅटट्रिक घेतली. दीपक हुड्डा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना भोपळाही फोडता आला नाही. टीम साउथीच्या हॅटट्रिकने भारत २००चा टप्पा ओलांडू शकला नाही. त्याच्याव्यतिरिक्त, लॉकी फर्ग्युसन याने २ आणि ईश सोधी याने १ गडी बाद करत त्याला साथ दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यजमान न्यूझीलंडकडून फलंदाजी करताना कर्णधार केन विलियम्सन याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ५२ चेंडूत ६१ धावा करत अर्धशतक पूर्ण केले. त्याने २ षटकार आणि ४ चौकार मारले. त्याच्याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. डेव्हॉन कॉनवे याने २५ धावांचे योगदान दिले. ग्लेन फिलिप्स आणि डॅरिल मिशेल यांनी अनुक्रमे १२ आणि १० धावा केल्या. यावेळी भारताकडून गोलंदाजी करताना २.५ षटकात १० धावा देत दीपक हुड्डाने ४ गडी बाद केले. त्याच्याव्यतिरिक्त युजवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. तसेच, भुवनेश्वर कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी १ गडी बाद करत त्याला साथ दिली. सामन्यादरम्यान पावसाने व्यत्यय आणत तब्बल २७ मिनिटांचा खेळ वाया घालवला, मात्र षटकांच्या संख्येत कोणतीही घट झाली नाही ही विशेष बाब लक्षात घेण्यासारखी आहे.