शुक्रवार (१८ नोव्हेंबर) पासून न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टनमध्ये सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. त्याआधी प्राइम व्हिडिओ वर आयोजित कार्यक्रमामध्ये बोलताना टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि माजी वेगवान गोलंदाज झहीर खान यांनी उमरान मलिकच्या वेगवान गोलंदाजीचे कौतुक केले. शास्त्री आणि झहीर यांचा असा विश्वास आहे की “न्यूझीलंडमधील आगामी व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये उमरान उत्कृष्ट प्रदर्शन करेल आणि तो त्याच्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात त्याचे स्थान नक्कीच निश्चित करेल.”
झहीर खानने प्राइम व्हिडिओद्वारे आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना सांगितले, “तुमच्या वेगवान आक्रमणात विविधता असणे आवश्यक आहे आणि अशा पद्धतीचे अनुसरण करणारे अनेक संघ आपण पाहिले आहेत. तुम्हाला डावखुऱ्या तसेच चेंडू स्विंग करू शकेल अशा गोलंदाजाची गरज आहे. म्हणजेच एक परिपूर्ण वेगवान गोलंदाजाची आवश्यकता आहे.”
झहीर पुढे म्हणाला, “जर सर्व काही एकाच पॅकेजमध्ये उपलब्ध असेल, तर त्याहूनही चांगले दुसरे काहीच नाही. मात्र ते तसे नसेल, तर तुम्हाला गोलंदाजीच्या आक्रमणातील क्रमवारीमध्ये विविधता वापरणे गरजेचे ठरते आणि वेगवेगळ्या परिस्थितींनुसार त्यात बदल करणे देखील आवश्यक ठरते. उमरान हा एक अतिशय प्रतिभावान गोलंदाज आहे आणि जर त्याने सातत्याने उत्तम प्रदर्शन केले तर त्याचे संघातील स्थान देखील निश्चित होईल.” त्याच कार्यक्रमा दरम्यान रवी शास्त्री म्हणाले की, “गोलंदाजाकडे सर्वोत्तम वेग असल्याशिवाय पर्याय नाही आणि उमरानकडे तो वेग आहे, त्यामुळे त्याला सर्वोच्च स्तरावर प्रगती करण्यासाठी केवळ चांगल्या प्रदर्शनाची गरज नाही तर तो खेळ पुढे सातत्याने सुरु ठेवणे आवश्यक आहे.”
शास्त्री पुढे बोलताना म्हणाले, “तो भारतातील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे आणि विश्वचषकात काय घडले ते तुम्ही पाहिले आहे. हरिस रौफ, नसीम शाह आणि अॅनरिक नॉर्टजे या वेगवान गोलंदाजांनी समोरच्या संघाला नाकीनऊ आणले. त्यामुळे वेगवान गोलंदाजाला पर्याय नाही. जरी तुम्ही छोट्या लक्षाचा बचाव करत असाल, तर उमरानसाठी ही एक संधी आहे, आशा आहे की तो नक्कीच चांगले प्रदर्शन करेल. ”