IND vs PMXI Harshit Rana conceded 44 runs and bagged 4 wickets : कॅनबेरा येथे रविवारी झालेल्या सराव सामन्यात भारताने शानदार विजयाची नोंद केली. टीम इंडियाने पीएम इलेव्हनचा ६ विकेट्सने पराभव केला. भारताकडून शुबमन गिलने दमदार कामगिरी करत अर्धशतक झळकावले. तर वॉशिंग्टन सुंदरने ४२ धावांची स्फोटक खेळी खेळली. हर्षित राणाने अप्रतिम गोलंगादाजी करताना सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी हा अप्रतिम विजय होता.

या सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला, तर दुसऱ्या दिवसाच्या खेळात दोन्ही संघांनी ४६-४६ षटके खेळण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर हर्षित राणाने भेदक गोलंदाजी करत यजमान संघाला आपल्या पुढे गुडघे टेकायला भाग पाडले. भारतीय गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियन पीएम इलेव्हन संघ ४३.२ षटकात २४० धावांवरच गारद झाला. या सामन्यात भारतीय संघाच्या गोलंदाजीत हर्षित राणाने अप्रतिम कामगिरी करत एकूण ४ विकेट्स आपल्या नावावर केले.

त्याने ६ षटके गोलंदाजी करताना ४४ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. यादरम्यान राणाने आपल्या शानदार गोलंदाजीने दोन फलंदाजांना त्रिफळचीत केले. राणाने जॅक क्लेटन, ऑलिव्हर डेव्हिस, जॅक एडवर्ड्स आणि सॅम हार्पर यांना तंबूचा रस्ता दाखवला. यानंतर भारतीय संघ फलंदाजीसाठी उतरला. टीम इंडियाने ४६ षटके फलंदाजी करत ४ विकेट गमावून २५७ धावा केल्या. भारताची धावसंख्या ऑस्ट्रेलियापेक्षा जास्त होती. त्यामुळे टीम इंडियाला या सामन्यात विजयी घोषित करण्यात आले.

हर्षित राणाशिवाय आकाश दीपनेही घेतल्या दोन विकेट्स –

हर्षित राणा व्यतिरिक्त आकाश दीपलाही दोन दिवसीय सराव सामन्यात गोलंदाजी करण्याची संधी मिळाली, ज्यात त्याने दोन विकेट्स घेतल्या. याशिवाय मोहम्म सिराज, प्रसिध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा यांनीही प्रत्येकी एक विकेट्स घेतली. या सामन्यात रविचंद्रन अश्विनला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. अशाप्रकारे हर्षित राणा व्यतिरिक्त आकाश दीपने आपल्या धारदार गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

हेही वाचा – Jay Shah : जय शाह यांनी स्वीकारली ICC च्या चेअरमनपदाची जबाबदारी, चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टीम इंडियाच्या विजयात दोन खेळाडूंनी बजावली महत्त्वाची भूमिका –

टीम इंडियाच्या विजयात दोन खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावली. हे दोन खेळाडू दुसरे कोणी नसून शुबमन गिल आणि हर्षित राणा आहेत. या दोन्ही खेळाडूंनी या सामन्यात अप्रतिम कामगिरी केली. सामन्याच्या पहिल्या डावात हर्षित राणाची गोलंदाजी अप्रतिम होती. सामन्याच्या पहिल्या डावात राणाने ६ षटकांत ४४ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. यानंतर शुबमनने धावांचा पाठलाग करताना अर्धशतक झळकावले. या सामन्यात गिलने ६२ चेंडूत ५० धावा केल्या. दुसरीकडे जैस्वालनेही ४५ धावांची खेळी केली.