पीटीआय, थिरुवनंतपुरम भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांतील दुसरा ट्वेन्टी-२० सामना आज, रविवारी थिरुवनंतरपुरम येथे खेळवला जाणार असून पाच सामन्यांच्या मालिकेतील आपली आघाडी दुप्पट करायची झाल्यास यजमान संघाच्या गोलंदाजांना कामगिरीत सुधारणा करावी लागणार आहे. विशाखापट्टणम येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने २०९ धावांचा यशस्वी पाठलाग करताना मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. कर्णधार सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि रिंकू सिंह यांच्या दमदार फलंदाजीमुळे भारताला हा विजय शक्य झाला. गोलंदाजांनी मात्र निराशाच केली. वेगवान गोलंदाज मुकेश कुमारचा (चार षटकांत २९ धावा) अपवाद वगळता भारताच्या सर्वच गोलंदाजांनी आठहून अधिकच्या धावगतीने (इकोनॉमी) धावा दिल्या. आता थिरुवनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टीही फलंदाजीला अनुकूल असण्याची शक्यता असल्याने भारतीय गोलंदाजांची पुन्हा कसोटी लागेल. हेही वाचा >>>वर्ल्डकप गमावला पण विक्रमी प्रेक्षकसंख्या कमावली; भारतात ४२२ अब्ज मिनिटे पाहिला गेला टीव्ही पहिल्या सामन्यात अर्शदीप सिंग आणि प्रसिध कृष्णा या वेगवान गोलंदाजांनी षटकामागे अनुक्रमे १०.२५ आणि १२.५०च्या धावगतीने धावा दिल्या. तर लेग-स्पिनर रवी बिश्नोई सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने चार षटकांत १३.५०च्या धावगतीने ५४ धावा खर्ची केल्या. मात्र, केवळ एका सामन्यानंतर संघात बदल होण्याची शक्यता कमी असल्याने या गोलंदाजांचे संघातील स्थान दुसऱ्या सामन्यात कायम राहणे अपेक्षित आहे. मात्र, त्यांनी आपला खेळ उंचावणे आवश्यक आहे. फलंदाजीत भारताची भिस्त पुन्हा प्रामुख्याने कर्णधार सूर्यकुमारवर असेल. सूर्यकुमारने पहिल्या सामन्यात ४२ चेंडूंत ८० धावांची अप्रतिम खेळी केली होती. किशनने अर्धशतकासह सूर्यकुमारला मोलाची साथ दिली होती, तर रिंकूने विजयवीराची भूमिका चोख बजावली होती. या तिघांच्या कामगिरीत सातत्य राखण्याचा प्रयत्न असेल. तर यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड आणि तिलक वर्मा हे फलंदाज अधिक योगदान देण्यासाठी उत्सुक असतील. पावसाचे सावट थिरुवनंतपुरम येथे रविवारी होणाऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यावर पावसाचे सावट आहे. शनिवारी सायंकाळी येथे पाऊस झाला. रविवारीही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, सामना रद्द करावा लागण्याइतका पाऊस होणे अपेक्षित नाही. ’ वेळ : सायं. ७ वा. ’ थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८-१, जिओ सिनेमा