भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दुसऱ्या कसोटी सामन्याआधी, बीसीसीआयची क्रिकेट प्रशासकीय समिती भारतीय संघाच्या कामगिरीचं मुल्यांकन करणार असल्याची माहिती समोर येतेय. ‘द संडे एक्स्प्रेस’ वृत्तपत्राने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. १० आणि ११ ऑक्टोबर रोजी क्रिकेट प्रशासकीय समितीची हैदराबाद येथे बैठक होणार आहे, या बैठीकीत भारतीय संघ व्यवस्थापन, निवड समितीचे प्रमुख एम. एस. के. प्रसाद उपस्थित राहणार असल्याचं समजतं आहे.

अवश्य वाचा – मुरली विजय-करुण नायरकडून बीसीसीआय कराराचं उल्लंघन

क्रिकेट प्रशासकीय समिती या बैठकीत भारतीय संघ व्यवस्थापनाशी चर्चा करुन संघातील प्रमुख खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा घेणार आहे. भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा, इंग्लंड दौरा आणि आशिया चषकातील भारतीय संघाच्या कामगिरीचा आढावाही या बैठकीत घेतला जाईल. याचसोबत कर्णधार विराट कोहली, उप-कर्णधार अजिंक्य रहाणे आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीही या बैठकीला हजर राहतील असं सांगितलं जातंय. परदेश दौऱ्यात यंदा भारतीय संघाची कामगिरी चांगली झालेली नाही. आफ्रिका दौऱ्यात भारत २-१ ने कसोटी मालिका हरला, तर इंग्लंड दौऱ्यातही भारताला ४-१ अशा लाजीरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं.

परदेश दौऱ्यातील भारतीय संघाने केलेल्या खराब कामगिरीवर मध्यंतरी बीसीसीआय व क्रिकेट प्रशासकीय समिती नाराज असल्याची माहिती होती. मात्र प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराट कोहलीचा भारतीय संघ गेल्या १५-२० वर्षातला सर्वोत्तम संघ असल्याचं जाहीर करत संघाची पाठराखण केली. मात्र हैदराबादमध्ये होणाऱ्या बैठकीत परदेश दौऱ्यांमध्ये भारतीय फलंदाजांनी केलेली हाराकिरी, प्रमुख खेळाडूंचा ढासळलेला फॉर्म यावर चर्चा होणार असल्याचं कळतंय. त्यामुळे या बैठकीचा भारतीय संघाच्या भवितव्यावर काय परिणाम होतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवश्य वाचा – बायकोला सोबत राहू द्या ना! विराट कोहलीची बीसीसीआयला विनंती