पंजाबच्या संघाने सलामीच्या सामन्यात राजस्थानवर १४ धावांनी विजय मिळवला. १८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला केवळ १७० धावांपर्यंत मजल मारता आली. पंजाबकडून गेलने सर्वाधिक ७९ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानच्या बटलरचे (६९) प्रयत्न तोकडे पडले. १८५ धावांच्या या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर जोस बटलर याने शानदार अर्धशतक केले. पण तो ४३ चेंडूत ६९ धावांवर असताना त्याला विचित्र पद्धतीने बाद करण्यात आले. पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्विन याने अर्धशतकवीर जोस बटलरला अजब पद्धतीने धावबाद केले. गोलंदाजीत चेंडू टाकण्याआधी त्याने नॉन-स्ट्राईककडील यष्ट्यांच्या वरील बेल्स उडवल्या. त्यावेळी बटलर धाव घेण्यासाठी क्रीजबाहेर निघाला होता. त्यामुळे पंचानी त्याला बाद ठरवले. यानंतर अश्विनवर प्रचंड टीका करण्यात आली. या संदर्भात आता BCCI कडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

BCCI चे एक अधिकारी IANS वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की मैदानावर खेळत असताना एखाद्या फलंदाजाला गोलंदाजाने आपल्या क्रिकेटमधील कौशल्याने बाद करावे ही खरी खिलाडूवृत्ती आहे. सामने पाहणारे प्रेक्षक आणि त्यातून शिकणारी पिढी हीच खिलाडूवृत्ती पाहण्यासाठी येतात. त्यामुळे अश्विनने खिलाडूवृत्तीचे भान राखणे गरजेचे होते. सामनाधिकारी आणि पंच यांची याबाबत निर्णय देण्यात चूक झाली. जर सामनाधिकाऱ्यांनी सारासार विचासर केला असता, तर बटलरला नाबाद ठरवता येऊ शकले असते. याचबरोबर नियम आणि खिलाडीवृत्ती या दोनही गोष्टी लक्षात ठेवून अश्विनने खेळायला हवे होते, असेही ते म्हणाले.

जर फलंदाज तुफानी खेळी करत असेल, तर त्याला बाद करण्यासाठी गोलंदाजाने क्रिकेटमधील कौशल्य दाखवले पाहिजे. Gentleman’s Game मध्ये त्या पद्धतीचा खेळ अपेक्षित आहे. खेळात स्पर्धा असणे चुकीचे नाही, पण त्याबरोबरच खेळाची पत राखली जाणेही आवश्यक आहे, असे BCCI अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

दरम्यान, आव्हानाचा पाठलाग करताना रहाणे-बटलरने फटकेबाजी करत राजस्थानला धडाकेबाज सुरूवात करून दिली. त्यामुळे ६ व्या षटकात राजस्थानने अर्धशतकी मजल मारली. त्यानंतर कर्णधार रहाणे बाद झाला. त्याने २७ धावा केल्या. बटलर आणि सॅमसनने फटकेबाजी सुरूच ठेवली. पण पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्विन याने अर्धशतकवीर जोस बटलरला अजब पद्धतीने धावबाद (६९) केले. गोलंदाजीत चेंडू टाकण्याआधी त्याने नॉन-स्ट्राईककडील यष्ट्यांच्या वरील बेल्स उडवल्या. त्यावेळी बटलर धाव घेण्यासाठी क्रीजबाहेर निघाला होता. त्यामुळे पंचानी त्याला बाद ठरवले. त्यानंतर राजस्थानच्या डावाला गळती लागली. सॅमसनने ३० तर स्मिथने २० धावा केल्या. उर्वरित फलंदाज एकेरी धावसंख्येवर माघारी परतले. पंजाबकडून सॅम करन, राजपूत, रहमानने २-२ बळी घेतले.

नाणेफेक जिंकून राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पंजाबला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. टीम इंडियाकडून फारसा प्रभावी न ठरलेल्या लोकेश राहुलची IPL ची सुरुवातदेखील वाईट झाली. धवल कुलकर्णीने त्याचा बळी टिपत राजस्थानला पहिले यश मिळवून दिले. राहुलने केवळ ४ धावा केल्या. या दरम्यान पंजाबचा सलामीवीर ख्रिस गेल याने एक नवा इतिहास रचला. त्याने आपल्या डावात ६ धावा करत IPL मध्ये ४ हजार धावांचा टप्पा पार केला. हा टप्पा सर्वात जलद पार करण्याचा मान गेलला मिळाला. पण ख्रिस गेल मैदानात असूनही पंजाबची सुरुवात संथ झाली. पंजाबने ८ षटकात अर्धशतक पूर्ण केले. गेल संयमी खेळ करत असल्याने मयंक अग्रवालने फटकेबाजीची जबाबदारी स्वतःवर घेतली. पण त्याला फार मोठी खेळी करता आली नाही. तो २४ चेंडूत २ षटकार आणि १ चौकार लगावून २२ धावांवर बाद झाला. त्यानंतर २९ चेंडूत ३४ धावांची संयमी खेळी करणाऱ्या गेलने जयदेव उनाडकटला चोपून काढले. सलग ३ चौकार आणि त्यानंतर षटकार अशी फटकेबाजी करत गेलने ३३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. पण झंझावाती खेळ करणारा ख्रिस गेल ७९ धावांवर बाद झाला. राहुल त्रिपाठी याने सीमारेषेवर त्याचा अप्रतिम झेल टिपला. ४७ चेंडूच्या खेळीत गेलने ८ चौकार आणि ४ षटकार खेचले. बेन स्टोक्सने त्याला माघारी धाडले. पाठोपाठ निकोलस पूरण १२ धावा काढून बाद झाला. पण सर्फराजने २९ चेंडूत धमाकेदार नाबाद ४६ धावांची खेळी केली.