आयपीएलचा यंदाचा हंगाम पाच वेळा जेतेपद जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स संघासाठी सर्वोत्तम नव्हता. असे असले तरी हा संघ लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. मुंबई इतकी यशस्वी होण्याचे कारण म्हणजे कर्णधार रोहित शर्मा, कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराहसारखे खेळाडू संघात असणे. मात्र आता आयपीएल २०२२मध्ये सर्व संघात नवीन खेळाडूंची भरणा होणार आहे. मेगा ऑक्शनमध्ये प्रत्येक संघाला दोन किंवा तीन खेळा़डूंना रिटेन करता येईल, असे म्हटले जात आहे. त्यामुळे मुंबईलाही आपले काही स्टार खेळाडू सोडावे लागतील.

असे असले, तरी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला त्यांच्या मुख्य खेळाडूंना पुढील हंगामासाठी मुंबईच्या ड्रेसिंग रूममध्ये परत आणण्याची इच्छा आहे. सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, कायरन पोलार्ड, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह यासारख्या खेळाडूंचा समावेश असलेला मुंबई संघ रोहितला पुन्हा हवा आहे. मात्र त्याला त्याचे बरेच खेळाडू परत मिळू शकणार नसल्याचीही जाणीव आहे.

हेही वाचा – T20 WC : “…म्हणून भारतानं धोनीला मेंटॉर केलं”, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बरळला!

रोहित शर्मा २०११ मध्ये संघाशी जोडला गेला होता २०१३ मध्ये, त्याने मधल्या हंगामापासून कर्णधारपद स्वीकारले आणि त्याच वर्षी संघाला चॅम्पियन बनवले. गेल्या दोन हंगामांमध्ये विजय मिळवल्यानंतर मुंबई या वेळी प्लेऑफसाठी पात्र ठरू शकली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन नवीन संघ स्पर्धेत प्रवेश करत असल्याने, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) नवीन फ्रेंचायझींना लिलावात दर्जेदार खेळाडू निवडण्याची उज्ज्वल संधी देण्यासाठी कठोर रिटेन्शन पॉलिसी लागू करू शकते. अशा परिस्थितीत दोन नवीन संघांना लिलावात सहभागी होणाऱ्या खेळाडूंची निवड करण्याची संधी असेल. रोहित सध्या आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेसाठी भारतीय संघासोबत आहे. विराट कोहलीची कर्णधार म्हणून ही शेवटची स्पर्धा असल्याने रोहित टी-२० मध्ये भारताचा कर्णधार होण्याची शक्यता आहे.