IPL 2025 Hardik Pandya Statement on MI defeat: मुंबई इंडियन्सला अखेरच्या लीग सामन्यात पंजाब किंग्सविरूद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं. पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सचा ७ विकेट्स आणि ९ धावांनी पराभव केला. या पराभवासह मुंबईचा संघ आता गुणतालिकेत चौथ्या स्थानीच राहणार आहे. त्यामुळे मुंबईने आता टॉप-२ मध्ये जाण्याची संधी गमावली आहे. यासह मुंबईने पराभवासह जशी मोहिमेची सुरूवात केली होती, आता सांगताही पराभवाने केली आहे.
मुंबई इंडियन्सचे १४ सामन्यांत ८ विजय आणि ६ पराभवांसह १६ गुण आहेत, परंतु त्यांचे लीग सामने संपले आहेत. त्यामुळे मुंबई आता टॉप-२ मध्ये पोहोचू शकत नाही. याचा अर्थ असा की मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये एलिमिनेटर सामना खेळावा लागेल आणि जेतेपद जिंकण्यासाठी सलग ३ सामने जिंकावे लागतील.
मुंबई इंडियन्सने पंजाबविरूद्ध सामन्यात अनेक चुका केल्या, ज्याचा संघाला फटका बसला. कर्णधार हार्दिकने सामन्यानंतर वक्तव्य केले आहे. हार्दिक म्हणाला, “ज्याप्रकारची खेळपट्टी होती, ते पाहता आम्ही नक्कीच २० धावा कमी केल्या होत्या. पण असं कधी कधी होतं. आम्ही चांगलं क्रिकेट खेळत आलो आहे. पण आज आम्ही चांगलं क्रिकेट खेळलो नाही, ज्याचा आम्हाला फटका बसला. आयपीएलमध्ये असंच चित्र पाहायला मिळत. या फ्रँचायझीने ५ ट्रॉफी जिंकल्या आहेत, त्यामुळे हे नेहमीच अवघड असत.”
पुढे हार्दिक म्हणाला, “तुम्ही थोडं कुठे कमी पडलात की इतर संघ पुढे होत सामने जिंकण्यासाठी तयार असतात. मेसेज सर्वांसाठी साधा सरळ असेल. ही एक चूक झाली, यातून शिकूया आणि प्लेऑफसाठी सज्ज होऊया. आम्ही ज्या चुका झाल्या तो नंतर शोधू, पण एक फलंदाजी युनिट म्हणून आम्ही २० धावा जास्तीच्या करण्यात मागे पडलो.”
इम्पॅक्ट प्लेअर म्हणून कर्ण शर्मा एक चांगला पर्याय असू शकला असता, असं विचारताच हार्दिक म्हणाला, “खरंतर नाही, आम्ही अश्वनीबरोबर उतरण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण हंगामात हीच रणनिती होती. या खेळपट्टीवर त्याची गोलंदाजी फायदेशीर ठरेल असं आम्हाला वाटलं. (दुसऱ्या हाफमध्ये खेळपट्टी बदलली का?) तशीच होती. मला फारसा फरक जाणवला नाही. त्यांनी खरोखर चांगले क्रिकेट खेळले, ते दोघे फलंदाज, दुसऱ्या विकेटसाठीची ती भागीदारी उत्कृष्ट होती. आम्ही जेव्हा जेव्हा चूक केली तेव्हा त्यांनी खरोखरच चांगले फटके खेळले आणि मला वाटत नाही की गोलंदाजी युनिट म्हणून आम्ही आज चांगले होतो. एकंदरीतच आम्ही चांगलं क्रिकेट खेळलं नाही आणि त्याचा फटका बसला.”
एलिमिनेटरबाबत बोलताना हार्दिक म्हणाला, “एलिमिनेटरमध्ये एकंदरीत चांगलं क्रिकेट खेळणं. चांगली फलंदाजी, गोलंदाजी, प्लॅनप्रमाणे खेळणं. फलंदाजीत आम्ही काय सुधारणा करू शकतो, हे पाहू. गोलंदाजी विभाग म्हणून संपूर्ण स्पर्धेता आम्ही चांगली कामगिरी केली आहे. जर आम्ही पहिली फलंदाजी केली तर कशी आणि किती वेगाने फलंदाजी करणार यावर विचार करू. पण मला वाटतं नाही फार पॅनिक करायची गरज आहे.”
मुंबई इंडियन्सचा संघ कोणत्या संघाविरूद्ध एलिमिनेटर सामना खेळणार हे आऱसीबी वि. लखनौ सुपर जायंट्स यांच्यात २७ मे रोजी होणाऱ्या सामन्यानंतर निश्चित होईल.