Gautam Gambhir says MS Dhoni India’s most successful captain : आयपीएलच्या १७व्या हंगामातील २२वा सामना सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. या सामन्यापूर्वी केकेआरचा मार्गदर्शक गौतम गंभीरने महेंद्रसिंग धोनीचे कौतुक केले आहे. त्याने सांगितले की धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने तीन वेळा आयसीसीचे विजेतेपद पटकावले. धोनी हा भारताचा यशस्वी कर्णधारांपैकी एक असल्याचे गंभीर म्हणाला.

धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने टी-२० विश्वचषक २००७, एकदिवसीय विश्वचषक २०११ आणि चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३ जिंकली. जगातील यशस्वी कर्णधारांमध्ये धोनीच्या नावाचा समावेश होतो. तो सध्या आयपीएलमध्ये खेळताना दिसत आहे. या हंगामाच्या सुरुवातीला त्याने चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदाचाही राजीनामा दिला होता. आता त्याच्या जागी ऋतुराज गायकवाड संघाचे नेतृत्व करत आहेत. धोनीने आयपीएलमध्ये २२६ सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले असून त्याच्या संघाने १३३ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

गौतम गंभीरकडून धोनीचे कौतुक –

कोलकाता विरुद्ध चेन्नई सामन्यापूर्वी गौतम गंभीर स्टार स्पोर्ट्सवर म्हणाला, “एमएस हा भारताचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे, मला वाटत नाही की कोणीही त्या पातळीपर्यंत पोहोचू शकेल. त्याने भारताला तीन वेळा आयसीसी ट्रॉफी जिंकून दिली आहे.” गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाइट रायडर्सने दोनदा ट्रॉफीवर नाव कोरले आहे. आयपीएलच्या १७ व्या हंगामात संघ दमदार कामगिरी करताना दिसत आहे. आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यात कोलकाताने विजय मिळवला आहे. आज चेन्नईविरुद्धच्या विजयाकडे संघाची नजर असेल.

हेही वाचा – IPL 2024: धडाकेबाज बॅटसमनला पर्याय म्हणून दिल्लीने घेतला ‘हा’ बॉलर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘धोनी एक कुशल रणनीतीकार’ – गंभीर

यादरम्यान गंभीरने धोनीच्या मॅच फिनिश करण्याच्या कौशल्याची प्रशंसा केली. सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर येऊन मॅच फिनिश करू शकतो, असे त्याने सांगितले. गंभीर पुढे म्हणाला, “तो एक कुशल रणनीतीकार आहे. त्याला स्पिनर्सवर नियंत्रण कसे ठेवायचे, त्यांच्याविरुद्ध क्षेत्ररक्षण कसे सेट करायचे हे त्याला माहीत होते आणि तो कधीही हार मानत नव्हता. तो सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजी करायचा आणि तो जोपर्यंत असायचा तोपर्यंत आम्हाला माहित होते. तो मॅच फिनिश करू शकतो.”