आयपीएल २०२४ मधील प्लेऑफची शर्यत चांगलीच चुरशीची झाली आहे. सध्या कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. यंदाच्या मोसमात मोठे विक्रम रचत शानदार खेळी केलेल्या हैदराबाद संघालाही प्लेऑफचे तिकीट मिळवण्याची मोठी संधी आहे. हैदराबाद संघाचे अजून दोन सामने बाकी असून आज म्हणजे १६ मे रोजी संघाचा महत्त्वाचा सामना गुजरात टायटन्सविरूद्ध खेळवला जाणार आहे. पण या सामन्यापूर्वी हैदराबादमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोणत्या संघाला याचा फटका बसणार जाणून घ्या.

हैदराबादमध्ये आज दुपारी वाऱ्यासह पावसाच्या सरींनी जोरदार हजेरी लावली. सामना सनरायझर्स हैदराबाद वि गुजरात टायटन्सचा महत्त्वाचा सामना हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हैदराबादमधील पावसाचे काही फोटो, व्हीडिओही समोर आले आहेत. सामन्याच्या वेळेत म्हणजेच ७ ते ११ च्या दरम्यानही पावसाची ५० टक्केच्या आसपास शक्यता आहे. आता प्रश्न हा आहे की पावसामुळे हा सामना रद्द झाल्यास प्लेऑफच्या समीकरणावर याचा कसा परिणाम होईल. गुजरात टायटन्सचा संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीत बाहेर पडला आहे. त्यामुळे हा सामना रद्द झाल्यास त्यांनी काहीच फटका बसणार नाही.

हैदराबाद-गुजरातमधील सामना पावसामुळे रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. पण हैदराबादचा संघ सध्या १४ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे, त्यामुळे उर्वरित दोन्ही सामने जिंकून त्यांना क्वालिफायर-१ खेळण्याची चांगली संधी आहे. हैदराबादला हा सामना रद्द होऊन १ गुण मिळाल्यास संघ १५ गुणांवर पोहोचेल इथूनही त्यांना प्लेऑफचे तिकीट नक्की आहे. त्याचसोबत हैदराबादचा पंजाबविरूद्ध एक सामना बाकी आहे, ज्यात त्यांनी विजय मिळवल्यास १७ गुणांसह ते क्वालिफाय होतील.

हेही वाचा – RCB vs CSK सामन्यावर पावसाचे सावट, पावसामुळे मॅच रद्द झाल्यास कोणता संघ IPL मधून बाहेर होणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर चेन्नई सुपर किंग्स सध्या १४ गुणांसह आणि ०.५२८ च्या तगड्या नेट रन रेट सह पुढे आहे. तर आऱसीबीचा संघ १२ गुणांसह ०.३७८ च्या नेट रन रेटसह त्यांच्यामागे आहे. चेन्नई आणि आऱसीबीमागेही १८ मे रोजी मोठा सामना खेळायचा आहे, या सामन्यात जो संघ जिंकेल तो प्लेऑफमध्ये जाईल. पण आरसीबीला प्लेऑफ गाठायचे असेल तर चेन्नईच्या नेट रन रेटवर त्यांना मात करणं गरजेचं आहे. यासाठी आरसीबीला चेन्नईवर १८ धावांनी किंवा १८.१ षटकांत विजय मिळवावा लागेल.