IPL 2025 PBKS vs RCB Live Streaming: आयपीएल २०२५ आता अंतिम आणि महत्त्वाच्या सामन्यावर येऊन ठेपलं आहे. यंदाच्या मोसमात अनेक खेळाडूंनी आपल्या कामगिरीने प्रभावित केलं. पण आता अंतिम फेरी जिंकत कोणतातरी एक संघ आयपीएल ट्रॉफी पटकावणार आहे. आयपीएलचा अंतिम सामना ३ जून रोजी खेळवला जाणार आहे. या अंतिम सामन्यासाठीचे दोन्ही संघ ठरले आहेत.

आयपीएल २०२५ च्या प्लेऑफमध्ये पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स हे संघ पोहोचले होते. पहिल्या क्वालिफायर सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्सचा पराभव करत थेट अंतिम फेरीत धडक मारली. यानंतर एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा पराभव करत दुसऱ्या क्वालिफायरमध्ये जागा मिळवली. यानंतर दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पंजाब किंग्सने मुंबईला पराभवाचा धक्का देत अंतिम फेरी गाठली आहे.

दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सला विजयासाठी २०४ धावांचे लक्ष्य दिले होते. १८ वर्षांच्या आयपीएल इतिहासात कोणत्याच संघाने मुंबई इंडियन्ससमोर २०० अधिक धावांचं लक्ष्य गाठलं नव्हतं. पण पंजाब किंग्स आणि कर्णधार श्रेयस अय्यरने ते करून दाखवलं. पंजाबचे सुरूवातीचे ३ फलंदाज झटपट धावा करत बाद झाले. श्रेयस अय्यर आणि नेहाल वधेरा यांनी पंजाब किंग्सचा डाव सावरला. नेहालचं अर्धशतक थोडक्यासाठी हुकलं. पण श्रेयस अय्यर मात्र संघाला विजय मिळवून देत माघारी परतला. श्रेयस अय्यरने ४१ चेंडूत ५ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने ८३ धावांची नाबाद खेळी केली आणि संघाला मुंबईवर ३ विकेट्स विजय मिळवून दिला.

यंदा आयपीएलला नवा विजेता संघ मिळणार आहे, जो आयपीएल इतिहासात प्रथमच स्पर्धेचे जेतेपद पटकावणार आहे. यासह आयपीएल २०२५ मधील अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पंजाब किंग्स यांच्यात होणार आहे. श्रेयस अय्यर आणि रजत पाटीदार हे दोन नवे कर्णधार स्पर्धेत आमनेसामने असणार आहेत.

आयपीएल २०२५ मधील अंतिम सामना ३ जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याची वेळ संध्याकाळी ७.३० वाजता आहे. तर नाणेफेक ७ वाजता होईल. याशिवाय या अंतिम सामन्याला बीसीसीआयने भारतीय सैन्याच्या तिन्ही प्रमुख दलांना बोलावलं आहे. ऑपरेशन सिंदूरचे यश आणि भारत-पाकिस्तान तणावाच्या वातावरणात भारताच्या सैन्य दलाने केलेल्या कामगिरीचं कौतुक व त्यांना सलाम म्हणून बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सामन्यावर पावसाचं सावट

या सामन्यावर पावसाचं सावट असून बीसीसीआयने १२० मिनिटे बफर ठेवली आहेत. म्हणजेच संध्याकाळी अहमदाबादेत पाऊस असेल तर सामना दोन तास उशिराने सुरू होऊ शकतो. तसेच पाऊस थांबला नाही तर हा सामना उद्या खेळवला जाईल.