KKR players Credits Ex Indian Player After Win: कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२४ चे विजेतेपद पटकावल्यानंतर सगळीकडेच गौतम गंभीरची चर्चा होत आहे. १० वर्षांपासून ट्रॉफीची वाट पाहत असलेला KKR संघ गौतम गंभीर पुन्हा मेंटॉर म्हणून नियुक्त होताच विजेता ठरला. यासोबतच संघाचे मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडितही चर्चेत आहेत. पंडित हे भारतीय देशांतर्गत सर्किटमधील सर्वोत्तम प्रशिक्षक मानले जातात. या सगळ्यात वरुण चक्रवर्ती आणि व्यंकटेश अय्यर यांनी केकेआरच्या विजयाचे श्रेय मात्र तिसऱ्याच व्यक्तीला दिले आहे.

कोलकाताच्या संघातील विदेशी खेळाडूंसोबतच भारतीय खेळाडूंनीही आपली उत्कृष्ट कामगिरी दाखवली. संघाचे काही खळाडूंनी केकेआऱच्या चांगल्या कामगिरीचे श्रेय सहायक प्रशिक्षक अभिषेक नायर यांना दिले आहे. अभिषेक नायर गेल्या अनेक वर्षांपासून केकेआर संघासोबत आहे. केकेआर चॅम्पियन बनल्यानंतर वरुण चक्रवर्ती सामन्यानंतर मुलाखतीत म्हणाला – हा हंगाम माझ्यासाठी खूप चांगला होता. आता माझ्या डोक्यात फक्त एकाच व्यक्तीचा विचार आहे, ज्याने संघातील भारतीय खेळाडूंना घडवले आहे तो म्हणजे अभिषेक नायर.

फायनलमध्ये अर्धशतक झळकावणारा व्यंकटेश अय्यर म्हणाला – मी खूप आनंदी आहे, याचे संपूर्ण श्रेय अभिषेक नायरला जाते, ज्याप्रकारे त्याने फ्रँचायझीसाठी काम केले आहे. काही व्यक्तींच्या योगदानांकडे लक्ष दिले जात नाही, पण त्यांची दखल घेतली गेलीच पाहिजे. त्यानेच या संघातील भारतीय खेळाडूंना घडवलं आहे. आम्ही १० वर्ष ट्रॉफी जिंकण्याची वाट पाहिली आहे आणि याच सगळं श्रेय संघ व्यवस्थापन आणि कोचिंग स्टाफला जातं.

अभिषेक नायर संघाचा सहाय्यक प्रशिक्षक असण्यासोबतच केकेआर अकादमीचा प्रमुखही आहे. IPL 2022 च्या लिलावापूर्वी KKR ने वरुण चक्रवर्ती आणि व्यंकटेश अय्यर यांना रिटेन करताना शुभमन गिलला रिलीज केले होते. या निर्णयात अभिषेक नायरची महत्त्वाची भूमिका होती. ट्रॉफी जिंकल्यानंतर नायर म्हणाले की हे जेतेपद माझ्यासाठी सर्वकाही आहे. ही ट्रॉफी जिंकायला खूप वेळ लागला आहे. मी १६ वर्षांपासून आयपीएलमध्ये आहे आणि चॅम्पियन बनण्यासाठी बरीच वर्षे लागली.

देशांतर्गत क्रिकेटमधील अभिषेक नायर हे मोठे नाव आहे. तो मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळला आहे. आयपीएलच्या सुरुवातीच्या हंगामात तो मुंबई इंडियन्सचा भाग होता. २०१० च्या मोसमाच्या फायनलमध्ये मुंबईला चेन्नईविरुद्ध पराभव पत्करावा लागला हो आणि या अंतिम सामन्यात नायरही फायनलमध्ये खेळला. भारतीय संघासाठी खेळण्याची फारशी संधी त्याला मिळाली नसली तरी त्याने अनेक चांगल्या खेळाडूंना घडवले आहे.