आयपीएल २०२५ मधील प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा सामना पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स सामना खेळवला जात होता. स्पर्धेतील ५८वा सामना धरमशालाच्या मैदानावर सुरू होता. पण अचानक हा सामना रद्द केल्याची माहिती समोर येत आहे.

पंजाब १०.१ षटकांत १२२ धावांवर खेळत असताना स्टेडियममधील एक फ्लडलाईट बंद झाला. लाईट टॉवरमध्ये काहीतरी समस्या असल्यासारखे वाटत होते पण यानंतर इतर लाईट देखील बंद करण्यात आले आणि खेळाडूंना ताबडतोब मैदानाबाहेर पाठवण्यात आले. आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी सामना रद्द झाल्याची पुष्टी केली आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, जवळपासच्या भागात हवाई हल्ल्याच्या सूचनांमुळे सामना रद्द करावा लागला, ज्यामुळे डोंगराळ भागात ब्लॅकआउट करण्यात आले. फ्लडलाईट्स गेले तेव्हा पंजाब संघाने १०.१ षटकांत १ बाद १२२ धावा केल्या होत्या, ज्याचे कारण सुरुवातीला फ्लडलाइट बिघाड असल्याचे सांगण्यात आले. परंतु नंतर संघ आणि प्रेक्षकांना त्यांच्या सुरक्षेसाठी स्टेडियममधून बाहेर काढण्यात आले.

सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सामना रद्द करण्यात आला. धर्मशाळेतील एचपीसीए स्टेडियममधील फ्लडलाइट्स बंद होऊ लागल्यानंतर हे घडलं. आयएएनएसच्या वृत्तानुसार, जम्मूमध्ये जारी केलेल्या रेड अलर्टच्या आधारे खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी सांगितले.

पंजाब आणि दिल्ली यांच्यातील हा सामना रद्द केल्याने आता दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण मिळेल. या सामन्यात पंजाबची स्थिती खूपच मजबूत होती, त्यामुळे त्यांच्यासाठी ही वाईट बातमी आहे. तर दिल्लीसाठी आता आयपीएल २०२५ च्या प्लेऑफमध्ये जाण्याची चिंता वाढली आहे.

पंजाब किंग्सने या सामन्याला दणक्यात सुरूवात केली. पंजाब किंग्सने १० षटकांत १२२ धावा केल्या. यानंतर अकराव्या षटकातील पहिल्या चेंडूवर टी नटराजनने प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंगची भागीदारी तोडली. यानंतर दुसऱ्या चेंडूपूर्वी फ्लडलाईट बंद झाले आणि सामना थांबवला. यापूर्वी पावसामुळे सामन्याला ७.३० ऐवजी ८.३० ला सुरूवात झाली होती.