आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील २७ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्ग बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांमध्ये अटीतटीची लढत झाली. या सामन्यात बंगळुरुचा १६ धावांनी दणदणीत विजय झाला. बंगळुरुच्या या विजयासाठी दिनेश कार्तिकने अपार मेहनत घेतली. त्याने नाबाद ६६ धावा केल्यामुळे आरसीबीसाठी विजय सोपा झाला. दरम्यान, सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या दिनेश कार्तिकने त्याच्या आयपीएलमधील खेळाबद्दल तसेच त्याच्या स्वप्नाबद्दल सांगितलं आहे. त्याने आगामी टी-२० विश्वचषकामध्ये भारतासाठी खेळण्याची इच्छा असल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा >>> IPL 2022, RCB vs DC : बंगळुरूची दिल्लीवर १६ धावांनी मात, डीके दादा पुन्हा तळपला !

बंगळुरु आणि दिल्ली यांच्यात झालेल्या सामन्यात दिनेश कार्तिकने धडाकेबाज फलंदाजी केली. त्याच्या या खेळीमुळेच बंगळुरु संघ १८९ धावांचा डोंगर उभा करु शकला. त्या सामन्यानंतर बंगळुरुचा माजी कर्णधार विराट कोहली याने दिनेश कार्तिकची मुलाखत घेतली. यावेळी बोलताना “मला माझ्या देशासाठी खेळायचं आहे. हे माझं स्वप्न आहे. भारताने बहुराष्ट्रीय स्पर्धा जिंकून बराच काळ लोटला आहे. त्यामुळे या स्पर्धा जिंकण्यासाठी मदत करण्याचं माझं स्वप्न आहे. भारतीय टीमसाठी खेळायचं असेल तर अनेक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. हाच तो व्यक्ती आहे, जो काहीतरी वेगळं करतोय, असं लोकांनी म्हणायला हवं,” असं दिनेश कार्तिकने विराटसोबत बोलताना म्हटलंय.

हेही वाचा >>> IPL 2022, MI vs LSG : सचिनच्या बाजुला बसला अर्जुन तेंडुलकर, सामन्यातील गुरु-शिष्याचे फोटो व्हायरल

त्याचबरोबर दिनेशने आयपीएलमध्ये खेळण्यासाठी आतापर्यंत कोणती मेहनत घेतली, याबद्दलही सविस्तर सांगितले आहे. माझा हेतू साध्य करण्यासाठी मी रोज सराव केलेला आहे. माझ्या प्रशिक्षकांनीही त्यासाठी मोठी मेहनत घेतलेली आहे. तुम्ही जेव्हा वयाने मोठे होत असता तेव्हा शरीर तंदुरुस्त ठेवणे आणखी गरजेचे असते. त्यामुळे तंदुरुस्त राहण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न केलेला आहे, असेदेखील दिनेश कार्तिकने सांगितले.

हेही वाचा >>> “हा तर मरिन ड्राइव्ह आणि राजभवनापर्यंत षटकार मारतोय,” दिनेश कार्तिकची फलंदाजी पाहून बड्या व्यक्तीची प्रतिक्रिया

दरम्यान, शनिवारी झालेल्या सामन्यात बंगळुरुने दिल्लीवर १६ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात दिनेशने धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने नाबाद ६६ धावा करुन बंगळुरुला १८९ धावांपर्यंत नेऊन ठेवलं. या धावांचा पाठलाग करत असताना दिल्ली संघ फक्त १७३ धावाच करु शकला.