‘आम्ही पेशावरला खेळत होतो. त्यावेळी पाकिस्तानच्या एका चाहत्याने माझ्या दिशेने खिळा भिरकावला. पण आम्ही या गोष्टीचा बाऊ केला नाही. त्या खिळ्याने माझ्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असती. कदाचित डोळा फुटलाही असता. सामना १० मिनिटं थांबला. पण आम्ही ही गोष्ट पुढे नेली नाही. कारण आम्ही चांगलं क्रिकेट खेळत होतो. पाकिस्तानच्या संघाने भारतीय चाहत्यांच्या वर्तनाकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या खेळाकडे लक्ष द्यावं. अशा गोष्टी वाढवू नयेत’, असं भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने समालोचनादरम्यान सांगितलं.

पठाण वर्ल्डकपसाठीच्या हिंदी कॉमेंट्री टीमचा भाग आहे. पाकिस्तानच्या संघाने अहमदाबाद इथे भारताविरुद्धच्या लढतीत भारतीय चाहत्यांच्या वर्तनाबाबत आयसीसीकडे तक्रार केली आहे. भारत विरुद्ध बांगलादेश सामनादरम्यान पठाणने ही आठवण सांगितली. भारतीय संघ २००४ मध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी ही घटना घडल्याचं पठाणचं म्हणणं आहे.

पाकिस्तानचा विकेटकीपर फलंदाज मोहम्मद रिझवान पॅव्हेलियनमध्ये परतत असताना भारतीय चाहत्यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या असं पाकिस्तान संघव्यवस्थापनाचं म्हणणं आहे. पाकिस्तान संघाचे संचालक मिकी ऑर्थर यांनी हा आयसीसीचा नव्हे तर बीसीसीआयचा कार्यक्रम असल्यासारखं वाटलं असं म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानी संघातील काही खेळाडू तापाने आजारी पडले होते. त्यातले काही खेळाडू आता बरे झाले असून सराव करू लागले आहेत. परंतु, दोन खेळाडू अजूनही गंभीर आहेत. त्यापैकी एकाला खूप ताप असून त्याच्यावर पाकिस्तानचे संघ व्यवस्थापन लक्ष ठेवून आहे. पाकिस्तानला आपला पुढचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचा आहे आणि अशातच संघासाठी ही वाईट बातमी समोर आल्याने कर्णधार बाबर आझमच्या चिंतेत भर पडली आहे. परंतु, संघव्यवस्थापनाने त्या दोन खेळाडूंची नावं सांगण्यास नकार दिला आहे.