KL Rahul Century in IND A vs ENG A: भारताचा अ संघ इंग्लंड लायन्सविरूद्ध दुसरा कसोटी सामना खेळत आहे. हा दुसरा सामना खेळण्यासाठी केएल राहुल आयपीएल २०२५ नंतर पोहोचला आहे. दरम्यान नॉर्थम्प्टन येथील काउंटी ग्राउंडवर भारत अ संघाकडून खेळताना केएल राहुलने शानदार शतक झळकावले आहे. राहुलने इंग्लंड लायन्सविरुद्ध सलामीला आला आणि १३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले.

आयपीएल २०२५ मधील केएल राहुलचा संघ दिल्ली कॅपिटल्स लीग स्टेजमध्ये बाहेर पडल्यानंतर राहुलने इंग्लंड दौऱ्यासाठी लवकर इंग्लंड गाठण्याचा निर्णय घेतला. यासह तो दुसरा अनऑफिशियल कसोटी सामना खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये दाखल झाला. आयपीएल खेळल्यानंतर तो इंग्लंडला गेल्यानंतरचे हे शतक खूप खास ठरलं, कारण भारत आणि इंग्लंड येथील परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. राहुलने हिरव्या खेळपट्टी आणि स्विंगिंग चेंडूंचा खूप चांगल्या प्रकारे सामना केला.

केएल राहुलने १५१ चेंडूत शतक झळकावले आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्याचे १९ वे शतक पूर्ण केले. भारताचा अ संघ जेव्हा अडचणीत होता, तेव्हा राहुलच्या बॅटमधून या धावा आल्या, ज्या संघासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरल्या. भारत-अ संघाची सुरुवात खराब झाली. यशस्वी जैस्वाल फक्त १७ धावा करून बाद झाला. त्यानंतर अभिमन्यू ईश्वरन देखील फक्त ११ धावा करू शकला. दोन विकेट्स पडल्यानंतर केएल राहुलने संघाची धुरा सांभाळली.

राहुलने करुण नायरसह मिळून संघाची धावसंख्या १२६ धावापर्यंत नेली. ४० धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर करुण नायरने आपली विकेट गमावली. यानंतर राहुलने यष्टीरक्षक ध्रुव जुरेलबरोबर शानदार शतकी भागीदारी केली आणि इंग्लंड लायन्सला बॅकफूटवर ढकलले. राहुलच्या शतकासह ध्रुव जुरेलनेही आपलं अर्धशतक पूर्ण केलं.

आगामी इंग्लंड दौऱ्याचा विचार करता केएल राहुलचं हे शतक खूप महत्त्वाचं आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या अनुपस्थितीत नवख्या कर्णधाराच्या नेतृत्त्वाखाली भारताचा इंग्लंडसमोर कसा टिकणार, यावर सर्वांच्या नजरा असणार आहेत. नव्या कसोटी संघासाठी हा इंग्लंड दौरा सोपा नसणार आहे. फार कमी अनुभवी खेळाडू संघात असल्याने केएल राहुलचा फॉर्म या मालिकेची दिशा निश्चित करू शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केएल राहुलनंतर ध्रुव जुरेलने ८७ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने ५२ धावांची खेळी केली. जुरेल वादळी फॉर्मात असून हे त्याचे सलग तिसरे अर्धशतक आहे. यासह पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने ७ विकेट्स गमावत ३१९ धावा केल्या आहेत.