मोहम्मद आमिरने हरभजन सिंगची माफी मागावी, असे मत पाकिस्तानचा माजी फिरकीपटू सईद अजमलने दिले आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने ट्विटरवर भारतीय क्रिकेटरटू हरभजनशी वाद घातला होता. या वागणुकीबद्दल आमिरने हरभजनची माफी मागावी, असे अजमलने म्हटले. सध्या सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तानने भारतावर विजय मिळवल्यानंतर आमिरने ट्विटरवर हरभजनला टोमणा मारला होता.

अजमल म्हणाला, “खेळाडूंनी एकमेकांशी चांगले वागले पाहिजे कारण खेळामुळे एकमेकांना जवळ येता येते. मला वाटते, आमिरने हरभजन आणि अख्तरच्या प्रकरणात उडी मारून चूक केली. त्यांनी याबद्दल माफी मागितली पाहिजे. दोन महान क्रिकेटपटू बोलत होते आणि संबंध नसताना आमिरने त्यांच्यामध्ये उडी घेतली.”

नेमका वाद काय आहे?

हरभजन सिंगने आपल्या व्हिडीओमध्ये हा सगळा वाद सांगितला आहे. या वादाला सुरुवात मोहम्मद आमिरच्या ट्वीटने झाली. पाकिस्तानने भारताचा पराभव केल्यानंतर मोहम्मद आमिरने हरभजन सिंगला ट्विटरवर छेडत “घरातला टीव्ही तर नाही फोडलास ना?” असा खोचक प्रश्न केला. यावरून संतापलेल्या भज्जीनेही त्याला त्याच शब्दांत उत्तर दिले. ट्विटरवरच या दोघांमध्ये वाद झाल्यानंतर शेवटी हरभजनने लॉर्ड्सवरच्या मॅचमध्ये मोहम्मद आमिरने केलेल्या स्पॉट फिक्सिंगची आठवण करून दिली. याच मुद्द्यावरून त्याने यूट्यूबवर टाकलेल्या व्हिडीओमधून मोहम्मद आमिरला सुनावले.

हेही वाचा – भारीच ना..! भारताचा ‘स्टार’ कॅप्टन खेळणार जगप्रसिद्ध बिग बॅश लीग; ‘या’ संघानं दिली संधी

दरम्यान, लॉर्ड्सवरच्या त्या नो बॉलवरून हरभजनने मोहम्मद आमिरला ऐकवले. “ज्या व्यक्तीने क्रिकेटला विकले, देशाला विकले, आपला इमान विकला, जो हे सगळे विकून लॉर्ड्समध्ये नो बॉल टाकून पैसे कमवायच्या प्रयत्नात होता, त्याच्यासमोर मी काही बोलणे ही माझी चूक होती. त्याची तेवढी पात्रता नाही”, असे हरभजन या व्हिडीओमध्ये म्हणाला होता.