जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात पंजाबच्या संघाने राजस्थानवर १४ धावांनी विजय मिळवला. १८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला केवळ १७० धावांपर्यंत मजल मारता आली. पंजाबकडून गेलने सर्वाधिक ७९ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानच्या बटलरचे (६९) प्रयत्न तोकडे पडले.जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात पंजाबच्या संघाने राजस्थानवर १४ धावांनी विजय मिळवला. १८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला केवळ १७० धावांपर्यंत मजल मारता आली. पंजाबकडून गेलने सर्वाधिक ७९ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानच्या बटलरचे (६९) प्रयत्न तोकडे पडले.

१८५ धावांच्या या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर जोस बटलर याने शानदार अर्धशतक केले. पण तो ४३ चेंडूत ६९ धावांवर असताना त्याला अजब पद्धतीने बाद करण्यात आले. पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्विन याने अर्धशतकवीर जोस बटलरला अजब पद्धतीने धावबाद केले. गोलंदाजीत चेंडू टाकण्याआधी त्याने नॉन-स्ट्राईककडील यष्ट्यांच्या वरील बेल्स उडवल्या. त्यावेळी बटलर धाव घेण्यासाठी क्रीजबाहेर निघाला होता. त्यामुळे पंचानी त्याला बाद ठरवले. यानंतर अश्विनवर प्रचंड टीका करण्यात आली. अश्विनच्या त्या कृत्यामुळे अश्विनने आणि पंजाबने अनेक चाहते गमावले असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न याने व्यक्त केले आहे.

बेन स्टोक्सने जर विराट कोहलीच्या बाबतीत अशा पद्धतीचे वर्तन केले असते, तर कसे वाटले असते? अश्विनने ज्या प्रकारे बटलरला धावबाद केले, त्यामुळे मला खूपच वाईट वाटले आहे. त्याच्या या कृत्यामुळे पंजाबने अनेक चाहते, विशेषतः तरुण मुले-मुलींचा चाहतावर्ग गमावला, असे वॉर्नने ट्विट केले आहे.

अश्विनचे कर्णधार आणि व्यक्ती म्हणून जे केलं ते मला पटलेलं नाही. IPL मध्ये सर्व कर्णधार खिलाडीवृत्तीच्या भिंतीवर स्वाक्षरी करतात आणि त्याप्रमाणे खेळण्याचे मान्य करतात. अश्विन जेव्हा चेंडू टाकण्यासाठी आला, तेव्हा त्याचा चेंडू टाकण्याचा विचार नव्हता. त्यामुळे तो चेंडू डेड बॉल देण्यात यायला हवा होता. बाकी आता BCCI नेच योग्य तो निर्णय घ्यावा. पण IPL मध्ये हे घडणे अशोभनीय आहे. संघाचे कर्णधार असताना तुम्ही मैदानावर जे काही करता, ते तुमच्या सहकाऱ्यांसाठी एक उदाहरण असते. त्यामुळे असा अशोभनीय आणि अखिलाडूवृत्तीचा खेळ का केला जावा? आता अश्विनने माफी मागून काहीही उपयोग होणार नाही. कारण अश्विन त्याच्या या वाईट कृत्यामुळे कायम लक्षात राहील, असेही वॉर्न म्हणाला.

दरम्यान, आव्हानाचा पाठलाग करताना रहाणे-बटलरने फटकेबाजी करत राजस्थानला धडाकेबाज सुरूवात करून दिली. त्यामुळे ६ व्या षटकात राजस्थानने अर्धशतकी मजल मारली. त्यानंतर कर्णधार रहाणे बाद झाला. त्याने २७ धावा केल्या. बटलर आणि सॅमसनने फटकेबाजी सुरूच ठेवली. पण पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्विन याने अर्धशतकवीर जोस बटलरला अजब पद्धतीने धावबाद (६९) केले. गोलंदाजीत चेंडू टाकण्याआधी त्याने नॉन-स्ट्राईककडील यष्ट्यांच्या वरील बेल्स उडवल्या. त्यावेळी बटलर धाव घेण्यासाठी क्रीजबाहेर निघाला होता. त्यामुळे पंचानी त्याला बाद ठरवले. त्यानंतर राजस्थानच्या डावाला गळती लागली. सॅमसनने ३० तर स्मिथने २० धावा केल्या. उर्वरित फलंदाज एकेरी धावसंख्येवर माघारी परतले. पंजाबकडून सॅम करन, राजपूत, रहमानने २-२ बळी घेतले.

नाणेफेक जिंकून राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पंजाबला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. टीम इंडियाकडून फारसा प्रभावी न ठरलेल्या लोकेश राहुलची IPL ची सुरुवातदेखील वाईट झाली. धवल कुलकर्णीने त्याचा बळी टिपत राजस्थानला पहिले यश मिळवून दिले. राहुलने केवळ ४ धावा केल्या. या दरम्यान पंजाबचा सलामीवीर ख्रिस गेल याने एक नवा इतिहास रचला. त्याने आपल्या डावात ६ धावा करत IPL मध्ये ४ हजार धावांचा टप्पा पार केला. हा टप्पा सर्वात जलद पार करण्याचा मान गेलला मिळाला. पण ख्रिस गेल मैदानात असूनही पंजाबची सुरुवात संथ झाली. पंजाबने ८ षटकात अर्धशतक पूर्ण केले. गेल संयमी खेळ करत असल्याने मयंक अग्रवालने फटकेबाजीची जबाबदारी स्वतःवर घेतली. पण त्याला फार मोठी खेळी करता आली नाही. तो २४ चेंडूत २ षटकार आणि १ चौकार लगावून २२ धावांवर बाद झाला. त्यानंतर २९ चेंडूत ३४ धावांची संयमी खेळी करणाऱ्या गेलने जयदेव उनाडकटला चोपून काढले. सलग ३ चौकार आणि त्यानंतर षटकार अशी फटकेबाजी करत गेलने ३३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. पण झंझावाती खेळ करणारा ख्रिस गेल ७९ धावांवर बाद झाला. राहुल त्रिपाठी याने सीमारेषेवर त्याचा अप्रतिम झेल टिपला. ४७ चेंडूच्या खेळीत गेलने ८ चौकार आणि ४ षटकार खेचले. बेन स्टोक्सने त्याला माघारी धाडले. पाठोपाठ निकोलस पूरण १२ धावा काढून बाद झाला. पण सर्फराजने २९ चेंडूत धमाकेदार नाबाद ४६ धावांची खेळी केली.