भारतीय कसोटी संघाचा फलंदाज अजिंक्य रहाणे पुन्हा आपल्या फॉर्मात परतला आहे. मागील काही काळापासून अजिंक्य मोठी खेळी करण्यात अपयशी ठरत होता, पण आता त्याने रणजी स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात शतक ठोकले. सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात रहाणेने संयमी खेळी करत आणि मुंबईच्या डावाला आधार देत शतक ठोकले.
काही दिवसांपूर्वी रहाणेकडून भारताच्या कसोटी संघाचे उपकर्णधारपदही काढून घेण्यात आले. त्याला कसोटी संघातून वगळण्याचीही चर्चा आहे, मात्र यादरम्यान त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शतक ठोकून निवड समितीला विचार करण्यास भाग पाडले आहे. अजिंक्य यावेळी आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळताना दिसणार आहे. त्याला १ कोटींमध्ये केकेआरने आपल्या संघात स्थान दिले.
हेही वाचा – IND vs WI : “दात दाखवू नकोस…”, रोहितनं पुन्हा एकदा चहलला केलं ट्रोल; पाहा VIRAL VIDEO
रहाणेने मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर शतक झळकावले. त्याने आपल्या खेळीत १४ चौकार आणि २ षटकार ठोकले आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ३६वे शतक पूर्ण केले. रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील अजिंक्य रहाणेचे हे २४वे शतक आहे. रहाणे सौराष्ट्र विरुद्ध मुंबईसाठी फलंदाजीसाठी आला तेव्हा संघाची धावसंख्या २ बाद २२ धावा होती. कर्णधार पृथ्वी शॉ १ धावा करून बाद झाला तर गोमेल ८ धावांवर बाद झाला. यानंतर रहाणेने प्रथम एसएम यादवच्या साथीने डावाची धुरा सांभाळली, मात्र तो १९ धावांवर बाद झाला. मात्र, रहाणेला सरफराज खानने साथ दिली.