नवी दिल्ली : ऋषभ पंतला मंगळवारी इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगामी हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या अपघातामुळे यष्टिरक्षक फलंदाज असलेला पंत १४ महिने क्रिकेटपासून दूर होता.

‘‘कर्णधार म्हणून ऋषभ पंतचे स्वागत करताना आनंद होत आहे. धैर्य व निडरता नेहमीच त्याच्या क्रिकेटसाठी महत्त्वाची राहिली आहे. आम्ही उत्साहाने आगामी सत्राची प्रतीक्षा करीत आहोत,’’ असे दिल्ली कॅपिटल्सचे अध्यक्ष पार्थ जिंदल यांनी निवेदनात म्हटले आहे. पंत यापूर्वी विशाखापट्टणम येथे झालेल्या संघाच्या शिबीरातही सहभागी झाला होता. यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये दिल्ली पंजाब किंग्सविरुद्ध आपला पहिला सामना २३ मार्चला खेळणार आहे.

हेही वाचा >>>अचूक निर्णयासाठी ‘आयपीएल’मध्ये नवी प्रणाली; जलद निर्णयांसाठी होणार फायदा;  प्रणालीवर काम करण्यासाठी १५ पंचांची निवड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) यापूर्वी पंतला ‘आयपीएल’मध्ये यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळण्यास परवानगी दिली होती. ‘‘ दुर्घटनेनंतर १४ महिने पुर्नवसनाच्या प्रक्रियेतून गेल्यानंतर ऋषभ पंत आता आगामी ‘आयपीएल’साठी यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळण्यास तंदुरुस्त आहे,’’ असे ‘बीसीसीआय’ने आपल्या वैद्याकीय अहवालात म्हटले आहे.