Amit Mishra says Shubman Gill has no idea of ​​captaincy : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिका नुकतीच पार पडली. या मालिकेत भारताच्या यंग ब्रिगेडने शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वेचा ४-१ धुव्वा उडवला. या मालिकेत शुबमनच्या नेतृत्वाखाली बऱ्याचा युवा खेळाडूंनी भारतीय संघात पदार्पण केले. मात्र, शुबमन गिलच्या कर्णधारपदाबाबत भारताचा अनुभवी क्रिकेटपटू अमित मिश्रा धक्कादायक विधान केले आहे. गिलला कर्णधारपदाची कल्पना नाही, असे तो म्हणाला.

भारताचा अनुभवी क्रिकेटपटू अमित मिश्राने शुभंकर मिश्राच्या पॉडकास्ट शोदरम्यान गिलच्या कर्णधारपदावर आपले मत मांडले. शुबमन गिल आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व करतो. अमित मिश्रा म्हणाला, ‘शुबमनला मी कर्णधार बनवणार नाही. कारण मी त्याला आयपीएलमध्ये पाहिलं होतं. त्याला नेतृत्व कसे करावे, हे माहित नाही. त्याला कर्णधारपदाची कल्पना नाही.’ गिलच्या नेतृत्वाखाली भारताने झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेची सुरुवात पराभवाने केली असली तरी उर्वरित चार सामने जिंकून भारताने मालिका जिंकली.

‘…म्हणून त्याला कर्णधार बनवू नये’

अमित मिश्रा पुढे म्हणाला, “फक्त तो भारतीय संघाचा भाग आहे म्हणून त्याला कर्णधार बनवू नये. गिलने गेल्या काही हंगामात आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे, त्याने भारतीय संघातही चांगली कामगिरी केली आहे. भारतीय संघाने त्याला कर्णधार बनवले कारण त्याला नेतृत्वाचा अनुभव यायला हवा, जो आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व करताना दिसत नव्हता.”

हेही वाचा – MS Dhoni : ‘त्याला उद्याच भारतात परत पाठवा…’, दक्षिण आफ्रिकेत धोनी श्रीसंतवर का संतापला होता? अश्विनने केला खुलासा

अमित मिश्राने सांगितले कर्णधाराचे पर्याय –

अमित मिश्राने टी-२० फॉरमॅटसाठी इतर संभाव्य कर्णधारांवरही प्रकाश टाकला. त्याने संजू सॅमसन, ऋषभ पंत आणि ऋतुराज गायकवाड यांना चांगले पर्याय म्हणून वर्णन केले. गायकवाड हा झिम्बाब्वे मालिकेसाठी संघाचा भाग होता, तर सॅमसन दुसऱ्या सामन्यापासूनच संघात सामील झाला होता. अनुभवी लेग स्पिनर म्हणाला, “मी त्याला (शुबमन गिल) आयपीएलमध्ये पाहिले आहे आणि त्याला नेतृत्व कसे करावे हे माहित नाही. त्याला कर्णधारपदाबद्दल काहीच माहिती नाही. त्याला कर्णधार का करण्यात आले? हा प्रश्न आहे. तो फक्त भारतीय संघात आहे याचा अर्थ त्याला कर्णधार बनवायचे नाही.”

हेही वाचा – IND vs SL : हार्दिक पंड्याने गौतम गंभीरला दिला झटका? श्रीलंका दौऱ्यावर या फॉरमॅटमध्ये खेळण्यास दिला नकार, काय आहे कारण?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत कोण नेतृत्व करणार?

शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताने झिम्बाब्वेविरुद्धची मालिका ४-१ अशी जिंकली. अशा परिस्थितीत आगामी श्रीलंका टी-20 मालिकेत संघाचे नेतृत्व कोण करणार हा मोठा प्रश्न आहे. मात्र, बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, ‘हार्दिक पंड्या भारतीय टी-२० संघाचा उपकर्णधार होता. तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठीही उपलब्ध आहे. त्यामुळे तो कर्णधार असेल.’