टी २० वर्ल्डकपमध्ये पाकिस्ताननंतर न्यूझीलंडने पराभूत केल्यानंतर भारतीय क्रीडाप्रेमींमध्ये निराशेचं वातावरण आहे. टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत टीम इंडियाने निराशाजनक कामगिरी सुरूच ठेवली आहे. दुबईच्या मैदानावर आज भारताला ८ गडी राखून न्यूझीलंडकडून लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. उपांत्य फेरीच्या शर्यतीसाठी अतिमहत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडचा कप्तान केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि फिरकीपटू ईश सोधी यांनी केलेल्या शिस्तबद्ध माऱ्यासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. न्यूझीलंडने भारताला २० षटकात ७ बाद ११० धावांवर रोखले. प्रत्युत्तरात सलामीवी डॅरिल मिशेल आणि केन विल्यमसन यांनी दमदार भागीदारी रच न्यूझीलंडच्या विजयावर सहज शिक्कामोर्तब केले. न्यूझीलंडने पराभूत केल्याने उपांत्य फेरीचा मार्ग खडतर झाला आहे. आता उपांत्य फेरीचं गणित जर तर वर अवलंबून आहे. भारताच्या पराभवानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला आहे. नेटकरी सोशल मीडियावर मीम्स शेअर आपला संताप व्यक्त करताना दिसत आहेत. भारताचा डाव नियमित सलामीवीरांपेक्षा वेगळा प्रयत्न म्हणून टीम इंडियाने इशान किशन आणि केएल राहुल ही जोडी आजमावून पाहिली. पण न्यूझीलंडने त्यांचा प्रयोग अयशस्वी ठरवला. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने इशानला (४) तर पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात टीम साउदीने राहुलला झेलबाद केले. राहुलने ३ चौकारांसह १८ धावा केल्या. पॉवरप्लेमध्ये भारताला २ बाद ३५ धावा करता आल्या. तिसऱ्या क्रमांकावर आलेला रोहित शर्मा आणि कप्तान विराट कोहलीकडून आधाराची अपेक्षा होती, पण फिरकीरपटू ईश सोधीने दोघांना जाळ्यात अडकले. त्यानंतर ऋषभ पंतही (१२) माघारी परतला. संथ खेळणारा हार्दिकही १९व्या षटकात माघारी परतला. शेवटच्या षटकात रवींद्र जडेजाने ११ धावा कुटल्यामुळे भारताा शंभरीपार पोहोचता आले. डावाच्या शेवटच्या षटकात भारताने शतक पूर्ण केले. या षटकात भारताने ११ धावा काढल्या. २० षटकात भारताने ७ बाद ११० धावा केल्या. रवींद्र जडेजाने २ चौकार आणि एका षटकारासह नाबाद २६ धावा केल्या. न्यूझीलंडकडून बोल्टने २० धावांत ३ तर सोधीने १७ धावांत २ बळी घेतले.