IND vs NZ 2nd T20I: न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यातील विजयानंतर सूर्यकुमार यादव, युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव एकमेकांशी बोलले. खरं तर, बीसीसीआयने तिघांमधील संभाषणाचा व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये चहलने सूर्याच्या फलंदाजीवर आपले मत मांडले आणि गंमतीने म्हटले, “रणजी ट्रॉफीमध्ये तुम्ही माझी फलंदाजी पाहिली आहे असे दिसते, म्हणून तुम्ही येथे हुशारीने फलंदाजी केली आणि आम्हाला विजय मिळवून दिला.” ज्यावर सुर्यानेही परत विनोद केला आणि म्हणाला, “मागील मालिकेत त्याने मला दिलेला तुमचा सल्ला मी पाळला आहे, मला त्याच्याकडून आणखी शिकायचे आहे, तो माझा फलंदाजी प्रशिक्षक आहे..” जेव्हा सुर्याने ह्याची आठवण करून दिली तेव्हा एकच हशा पिकला.

दुसऱ्या टी२० मध्ये, सूर्याने त्याच्या आक्रमक फलंदाजी शैलीच्या विरुद्ध संथ फलंदाजी केली आणि खेळपट्टीनुसार त्याचा भारतीय संघाचा डाव पुढे नेला. सूर्याने ३१ चेंडूत २६ धावा केल्या ज्यात फक्त एका चौकाराचा समावेश आहे. सूर्यकुमारची ही फलंदाजी पाहून चहलने त्याची चेष्टा केली. त्याचवेळी कुलदीपने चहलला अनेक प्रश्न विचारले आणि म्हणाला की, “तू आता टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहेस. तुला कसे वाटत आहे?” यावर चहलने उत्तर दिले की, “भारताकडून खेळणे ही अभिमानाची बाब आहे. हे माझ्यासाठी पुरेसे मोठे आहे.”

सूर्यकुमार यादवच्या कारकिर्दीतील सगळ्यात संथ खेळी

सूर्यकुमार यादवच्या लढाऊ खेळीच्या जोरावर, भारतीय क्रिकेट संघाने 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात अतिथी न्यूझीलंडचा ६ गडी राखून पराभव केला. या विजयासह भारताने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. या सामन्यात सूर्यकुमारने वेगळ्या पद्धतीने फलंदाजी केली. भारताचा हा ३६०-डिग्री फलंदाज वेगवान क्रिकेटमध्ये चौकार आणि षटकार मारताना दिसतो, पण लखनऊमध्ये झालेल्या सामन्यात तो एका नव्या अवतारात दिसला. उजव्या हाताच्या मधल्या फळीतील फलंदाजाने नाबाद २६ धावा केल्या. असे असतानाही त्याची ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून निवड करण्यात आली. असे का? यामागील कारण देखील तितकेच महत्वाचे आहे.

हेही वाचा: Women U19 WC: ‘अंडर-१९ विश्वविजेता कर्णधार पृथ्वी शॉ ते शफाली वर्मा…,’ राहुल द्रविडने खास शब्दात दिल्या शुभेच्छा, Video व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या आयसीसी टी२० क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सूर्यकुमार यादवने २६ चेंडूत एका चौकाराच्या मदतीने नाबाद ३१ धावा केल्या. मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या या प्रतिभावान फलंदाजाने कठीण खेळपट्टीवर आपल्या फलंदाजीची शैली बदलून कोणत्याही परिस्थितीत चांगली खेळी करण्यास सक्षम असल्याचे दाखवून दिले आहे. सूर्यकुमार यादवच्या टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ही सर्वात संथ खेळी आहे. त्याने सामना जिंकणारा डाव खेळला आणि शेवटपर्यंत तो बाद झाला नाही. या समंजस खेळीबद्दल सूर्यकुमारला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.