Virat Kohli comes now it seems like he can be dismissed without any issues : टीम इंडियाचा माजी कसोटी सलामीवीर आणि क्रिकेट समालोचक आकाश चोप्राने दावा केला आहे की, आता विरोधी संघाला विराट कोहली क्रीजवर उभा असल्याची भीती वाटत नाही. गेल्या दोन मालिकांमध्ये विराट कोहलीची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. या वर्षी विराट कोहलीने १२ डावात केवळ २२.७२ च्या सरासरीने एकूण २५० धावा केल्या आहेत. शतक सोडा, विराटने या वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये केवळ एक अर्धशतक झळकावले आहे.

आकाश चोप्रा काय म्हणाला?

नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत विराट कोहलीची सरासरी १५.५० इतकी होती. त्याला ६ डावात केवळ ९३ धावा करता आल्या, त्यापैकी एक डावात त्याने ७० धावा केल्या होत्या. विराटबद्दल आकाश चोप्रा त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला, “विराट कोहलीने मागील १० डावांमध्ये फक्त एकच अर्धशतक झळकावले आहे. याच्या पलीकडे बघितले तर लक्षात येईल की त्याने खूप काही केले आहे. खरं तर, तुम्ही त्याचे संपूर्ण वर्ष पाहू शकता. तो इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेचाही भाग नव्हता. त्यामुळे मला वाटते ती एक चूक होती. गेल्या पाच वर्षांची कहानी चांगली नाही आणि शेवटचे १० डाव तर अजिबात चांगले नाहीत.”

‘आता विराट कोहली आला की वाटते…’ –

आकाश चोप्रा पुढे म्हणाला, “विराट कोहली, सचिन तेंडुलकर किंवा सर व्हिव्हियन रिचर्ड्स, या खेळाडूंमध्ये एक चमक आहे, जेव्हा ते फलंदाजीला यायचे, तेव्हा ते मैदानावर राज्य करायचे. विराट कोहलीचे पण असेच होते. कारण त्याच्यामध्ये पण ती चमक होती. आता विराट कोहली आला की वाटते, त्याला कोणत्याही अडचणीशिवाय बाद केले जाऊ शकते. मी असे म्हणत नाही. हे तुम्ही विरोधी संघातील खेळाडूंच्या देहबोलीवरून समजू शकता.” आता विराट कोहली कधी फुल टॉसवर, तर कधी रन आऊटच्या रूपात विकेट गमावत आहे. हे त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत दिसले नाही.

हेही वाचा – Mohammad Kaif : ‘एजाज पटेलसारखे गोलंदाज प्रत्येक क्लबमध्ये सापडतील…’, मुंबईतील पराभवानंतर मोहम्मद कैफ टीम इंडियावर संतापला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टीम इंडिया आता काही दिवसांत बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघांत पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेला २२ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल गाठायची असेल, तर ही मालिका कोणत्याही परिस्थित जिंकणे आवश्यक आहे. त्यामुळे या मालिकेत विराट कोहलीच्या बॅटने धावांच्या रुपाने आग ओकणे खूप महत्त्वाचे आहे.