Ind vs Eng, Team India Captaincy: आयपीएल झाल्यानंतर भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माचा उत्तराधिकारी म्हणून शुबमन गिलची निवड करण्यात आली आहे. जसप्रीत बुमराह, केएल राहुल आणि ऋषभ पंतसारखे खेळाडू असताना ही जबाबदारी शुबमन गिलकडे का सोपवण्यात आली? काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या.
शुबमन गिलकडे भारतीय कसोटी संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवणं ही मुळीच आश्चर्यचकित करणारा निर्णय नाही. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी शुबमन गिलकडे भारतीय टी –२० संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली गेली होती. त्यानंतर श्रीलंका दौऱ्यावर सूर्यकुमार यादव कर्णधार असताना उपकर्णधारपदाची जबाबदारी शुबमन गिलकडे सोपवली गेली होती. इतकेच नव्हे तर, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी गिलकडे सोपवली गेली होती.
जसप्रीत बुमराहला कर्णधार न बनवण्याचं कारण काय?
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रोहित शर्मा कर्णधार असताना उपकर्णधारपदाची जबाबदारी जसप्रीत बुमराहकडे सोपवली गेली होती. रोहितच्या अनुपस्थितीत तो भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून आला होता. मात्र मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्यात त्याला दुखापतीमुळे बाहेर राहावं लागलं होतं. पाच कसोटी सामन्यांची मालिका ही खूप मोठी मालिका असते.
त्यामुळे बुमराह सर्व पाच सामने खेळणार की नाही याबाबतही शंका आहे. अशा स्थितीत बुमराहकडे कर्णधारपदाची जबाबदारी देणं योग्य ठरणार नाही. तो सर्व पाच सामन्यांसाठी उपलब्ध असण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे त्याचा वर्कलोड मॅनेज करण्यासाठी ही जबाबदारी जसप्रीत बुमराहकडे सोपवली गेली नाही.
केएल राहुल, ऋषभ पंतकडे नेतृत्वाची जबाबदारी न देण्याचं कारण काय?
केएल राहुल हा भारतीय संघातील अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. मात्र, त्याला आपलं संघातील स्थान टिकवून ठेवता आलेलं नाही. अनेकदा त्याला फ्लॉप कामगिरीमुळे संघाबाहेर व्हावं लागलं आहे. हेच कारण आहे की, त्याच्याकडे ही जबाबदारी सोपवली गेलेली नाही. ऋषभ पंतकडे भारतीय कसोटी संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवली गेली आहे. कर्णधार म्हणून ऋषभ पंतचा रेकॉर्ड तितका खास राहिलेला नाही. त्यामुळे ही जबाबदारी शुबमन गिलकडे सोपवली गेली आहे.