India vs Australia, WTC Final 2023: भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग सध्या इंग्लंडमध्ये असून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलवर समालोचन करत आहे. मात्र, कॉमेंट्री व्यतिरिक्त भज्जीने असे काही केले आहे, ज्यामुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला असून चाहते त्याचे खूप कौतुक करत आहेत.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळवला जात आहे. आतापर्यंतच्या दोन दिवसांच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचा वरचष्मा स्पष्टपणे दिसत आहे. दरम्यान, भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंगचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ओव्हलच्या मैदानावर हरभजन सिंग त्याच्या एका पाकिस्तानी चाहत्याला ऑटोग्राफ देण्यासाठी गुडघे टेकून गेला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हरभजन सिंगला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी कॉमेंट्री पॅनलमध्ये स्थान मिळाले आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर हरभजनने सामना पाहण्यासाठी आलेल्या एका अपंग पाकिस्तानी चाहत्याचे स्वागत केले. सीमारेषेजवळ जाऊन त्याला ऑटोग्राफ दिला. यादरम्यान हरभजन सिंगने गुडघ्यावर बसून फॅनसोबत फोटोही काढला.

आता हरभजन सिंगचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावर भारतीय चाहत्यांसोबत पाकिस्तानचे लोकही सातत्याने प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. हरभजन जेव्हा या पाकिस्तानी चाहत्याला ऑटोग्राफ देत होता, त्यावेळी कोणीतरी त्या चाहत्याला प्रश्न विचारला. छोट्या चाहत्याला विचारले “हरभजन सिंग कोणाचा मित्र आहे?” यावर चाहत्याने उत्तर देत शोएब अख्तरचे नाव घेतले.

हरभजन सिंग आणि शोएब अख्तर यांच्यात खूप चांगली मैत्री आहे

हरभजन सिंग आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांच्यातील भांडण क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा पाहायला मिळाले आहे. पण दोघेही मैदानाबाहेर खूप चांगले मित्र आहेत. अनेकदा दोन्ही खेळाडू एकमेकांचे पाय ओढताना दिसतात. हरभजन सिंग आणि शोएब अख्तर यांच्यात मैदानावर भांडण झाले असेल, पण मैदानाबाहेर दोघांमध्ये चांगली मैत्री आहे आणि दोघेही एकमेकांचे पाय खेचत राहतात. १३ वर्षांपासून भारताने एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. भारताने शेवटची आयसीसी ट्रॉफी २०१३ मध्ये जिंकली होती, जेव्हा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडमध्येच चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.

हेही वाचा: WTC Final 2023: अरे आवाज कोणाचा… मराठमोळ्या शार्दुल-अजिंक्यने ऑस्ट्रेलियाला पाजले पाणी, मात्र रहाणेचे शतक थोडक्यात हुकले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताचा पहिला डाव २९६ धावांवर आटोपला

ऑस्ट्रेलियाच्या ४६९ धावांच्या प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव २९६ धावांवर आटोपला. यासह ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावाच्या आधारे १७३ धावांची आघाडी घेतली आहे. भारताकडून अजिंक्य रहाणेने ८९ आणि शार्दुल ठाकूरने ५१ धावा केल्या. रवींद्र जडेजानेही ४८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने तीन बळी घेतले. स्कॉट बोलँड, कॅमेरॉन ग्रीन आणि मिचेल स्टार्क यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. नॅथन लायनने एक विकेट घेतली. या सामन्याला अजून अडीच दिवसांचा खेळ बाकी आहे. अशा स्थितीत दुसऱ्या डावात चांगली धावसंख्या उभारल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ भारतीय संघाला चौथ्या दिवशी पुन्हा फलंदाजीसाठी आमंत्रित करू इच्छितो. त्याचबरोबर कांगारू संघाला छोट्या धावसंख्येवर गुंडाळण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.