पुढील 12 ते 18 महिन्यांमध्ये फोन कॉल आणि इंटरनेटसह सर्व सेवा-सुविधांचा वापर महाग होण्याची शक्यता आहे. कारण येत्या दीड वर्षात फोन कॉल-इंटरनेटसह सर्व सेवा-सुविधांचे दर दोन वेळेस वाढवले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

‘दूरसंचार क्षेत्रातील सध्याची संरचना लाभदायक नाही. यामध्ये ऑपरेटरला योग्य परतावा मिळत नाही. त्यामुळे टेलिकॉम सेक्टरमधील शुल्कवाढ ‘अपरिहार्य’ आहे. परिणामी येत्या 12 ते 18 महिन्यात दोन वेळेस दरवाढ होऊ शकते’, असे आघाडीची कन्सल्टन्सी EY इंडियाने म्हटले आहे.

“सध्याच्या परिस्थितीत तातडीने दरवाढ होणार नाही, पण पुढील 12 ते 18 महिन्यात दोन टप्प्यात ही वाढ केली जाऊ शकते. त्यातील पहिली दरवाढ येत्या सहा महिन्यांमध्येच होण्याची शक्यता आहे”, असे EY चे प्रशांत सिंघल म्हणाले. “ही वाढ होईलच असे मी म्हणत नाही, पण बाजारात टिकून राहण्यासाठी 12 ते 18 महिन्यात दर वाढवणं टेलिकॉम कंपन्यांसाठी ‘अपरिहार्य’ आहे. ही दरवाढ नियामक हस्तक्षेपाने होते की टेलिकॉम उद्योग स्वत: ही दरवाढ करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल”, असेही ते म्हणाले. दरम्यान, यापूर्वी गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही टेलिकॉम कंपन्यांनी टॅरिफ दरवाढ केली होती.