पाणी हे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. पाण्याशिवाय जीवन नाही असे म्हटले जाते. पाण्याशिवाय आपण जगूच शकत नाही. पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करणे आरोग्यदायी ठरते. उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणे शरीरासाठी गरजेचे आहे. सतत येणाऱ्या घामामुळे शरीरातील पाणी कमी होते, ज्यामुळे डिहायड्रेशन होते. अशात शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. पण, गरम पाणी पिणे आपल्या शरीरासाठी आणखी चांगले आहे का?

काही वेळा उत्तम आरोग्यासाठी थंड पाण्याऐवजी गरम पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो, तर काही जण वजन कमी व्हावे यासाठी सतत गरम पाणी पीत असतात. सर्दी, खोकला, ताप यांसारख्या व्हायरल आजारांमध्ये गरम पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. अशाप्रकारे अनेकवेळा आपण गरम पाणी पितो, पण त्याचा शरीरावर काय परिणाम होत असेल याबद्दल जास्त माहिती नसते. हैदराबाद येथील केअर हॉस्पिटल्समधील क्लिनिकल आहारतज्ज्ञ जी सुषमा यांनी दिवसातून आठ ग्लास गरम पाणी प्यायल्याने शरीराचे काय होते, गरम पाणी पिण्याचे फायदे आणि तोटे सांगितले असल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे, त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

गरम पाणी पिण्याचे फायदे

पचनक्रिया सुधारते

गरम पाणी प्यायल्याने अपचनाची तक्रार दूर होऊन पचनक्रिया सुधारते. पचनक्रिया बरोबर असेल तर गॅस किंवा ॲसिडिटीही होत नाही. तसेच गरम पाणी पोटातील त्या गोष्टींना शरीरातून बाहेर फेकण्यास मदत करते, ज्या गोष्टींच्या पचनक्रियेत अडथळा येतो.

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

वजन कमी करण्यासाठी गरम पाणी मदत करते. दिवसभरात जेवल्यानंतर कोमट पाणी प्यायल्याने जेवण लगेच पचण्यास मदत होते. त्यामुळे वजन न वाढता नियंत्रणात राहते. यासोबतच गरम पाणी प्यायल्याने जास्त भूक लागत नाही.

(हे ही वाचा: तुमच्या घरी कायम असणारी ‘ही’ भाजी वाढलेले वजन झपाट्याने करेल कमी; लगेच करा रोजच्या जेवणात समावेश)

हायड्रेट होण्यास मदत

जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना गरम पाणी प्यायल्यास ते पाणी तुमच्या शरीराला हायड्रेट राखण्यास मदत करते.

गरम पाणी पिण्याचे तोटे

घशामध्ये जळजळ

अत्याधिक गरम पाणी पिण्याने तोंड, घसा आणि पोटात जळजळ होऊ लागते. त्यामुळे पाणी पिताना ते सामान्य तापमानावर अथवा कोमट करून प्यावे.

अंतर्गत अवयवांचे नुकसान

जास्त गरम पाणी प्यायल्याने शरीराच्या अंतर्गत अवयवांवरही वाईट परिणाम होतो. जास्त गरम पाण्यामुळे पोटात जळजळ होऊ शकते. शरीराच्या अंतर्गत ऊती संवेदनशील असतात, ज्यामुळे तेथे फोड येऊ शकतात.

अन्ननलिकेचे नुकसान होते

गरम पाणी प्यायल्याने अन्ननलिकेवर सर्वाधिक परिणाम होतो. तोंड आणि पोट यांना जोडणारी ही अन्ननलिका आहे. गरम पाणी प्यायल्याने या अन्ननलिकेतून दाणे बाहेर पडू लागतात. याबरोबरच त्यात जळजळही सुरू होते. ही वेदना दीर्घकाळ असते.

लक्षात घ्या गरम पाणी पिताना ते पाणी जास्त गरम असू नये याची काळजी घ्या. दिवसातून आठ ग्लास गरम पाणी पिणे आरोग्याच्या विविध सुधारणांचे स्वागत करू शकते. परंतु, पाणी फार गरम नसून कोमट असावे ही काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे, यामुळे तुम्ही निरोगी राहाल.