Acidic VS Alkaline : उन्हाळ्यात इतर ऋतूंच्या तुलनेत अधिक आळस, थकवा, अशक्तपणा आणि वारंवार विविध आजारांचा धोका वाढतो; ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. वाढलेली उष्णता, निर्जलीकरण, घाम अशा विविध कारणांमुळे आजारांचा धोका वाढतो. पण, आहारात विविध प्रकारच्या पदार्थांचा समावेश करून तुम्ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकता. दरम्यान, उन्हाळ्यात फळं, भाज्या, विविध प्रकारच्या शेंगा आणि काजू अशा पदार्थांचा समावेश करून तुम्ही निरोगी आरोग्य राखू शकता.
यासह मांस, दुग्धजन्य पदार्थ आणि विविध प्रकारचे तृणधान्य आणि कडधान्यांचे मध्यम सेवन करून तुम्हाला निरोगी पीएच पातळी राखण्यास मदत होऊ शकते. पण, पीएच पातळी आपल्या आतड्यांच्या आरोग्यात कशी भूमिका बजावते? तसेच उन्हाळ्यात आम्लयुक्त की अल्कधर्मी कोणत्या प्रकारचा आहार फायदेशीर ठरतो जाणून घेऊ.

द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ आणि क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट उषाकिरण सिसोदिया म्हणाल्या की, आम्ल आणि अल्कलाईन हे दोन्ही घटक तुमच्या आरोग्याचे नियमन करणाऱ्या प्रक्रियांमधील महत्त्वाचा घटक आहेत. ते pH स्केलशी संबंधित आहेत, जे ० ते १४ पर्यंतचे ग्रेडियंट आहे. pH पातळी ७ दरम्यान असल्यास ती शुद्ध पाण्यासारखी असते; जर पीएच पातळी ७ पेक्षा कमी असल्यास ती अम्लीय मानली जाते, तर ७ पेक्षा जास्त पीएच पातळी क्षारता दर्शवते, जसे की बेकिंग सोडा.

योग्य संतुलन राखणे का महत्त्वाचे आहे?

पीएच पातळीत संतुलन असणे पचन आणि इतर चयापचय प्रक्रियांसाठी आवश्यक असलेल्या एन्झाईम्सच्या योग्य कार्यासाठी मूलभूत आहे. पीएच संतुलन शरीराच्या पोषक तत्त्वांचे कार्यक्षमतेने शोषण करण्याच्या क्षमतेत महत्त्वाची भूमिका बजावते आणि डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करते, ज्यामुळे दीर्घकालीन आजारांचा धोका कमी होतो. याचा हाडांच्या आरोग्यावरदेखील परिणाम होतो. जर तुम्ही सतत आम्लयुक्त पदार्थ्यांचे सेवन करत असाल तर त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस होत हाडांचे आरोग्य बिघडते, असे डॉ. सिसोदिया यांनी सांगितले.

उन्हाळ्यात कोणता आहार चांगला?

किम हेल्थमधील क्लिनिकल न्यूट्रिशनच्या ग्रुप मॅनेजर डॉ. लीना साजू म्हणाल्या की, आंबट फळं, लोणचं, व्हिनेगर-आधारित सॉस, प्रक्रिया केलेले मांस, रिफाइंड साखर, जास्त कॅफिन आणि अल्कोहोल यांसारख्या आम्लयुक्त पदार्थांमुळे निर्जलीकरण होते. शरीरात उष्णता आणि आम्लाचे प्रमाण वाढते, यामुळे इलेक्ट्रोलाइट असंतुलन आणि पचनक्रिया मंदावते.

डॉ. संजू यांनी सांगितले की, उन्हाळ्यात आम्लयुक्त आहारापेक्षा अल्कधर्मी आहार अधिक फायदेशीर असतो. अल्कधर्मी पदार्थांमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते, ज्यामुळे ते शरीराला हायड्रेट ठेवते आणि शरीराला थंडावा मिळतो. हा आहार पचायला सोपा आणि शरीरासाठी अधिक आरामदायी असतो.

अल्कधर्मी पदार्थ पोटॅशियम, सोडियम आणि मॅग्नेशियमने समृद्ध असल्याने इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यासदेखील मदत करतात.

उदाहरणार्थ टरबूज, काकडी आणि भाज्या, जे उष्माघात रोखण्यास मदत करू शकतात. उन्हाळ्यात खरबूज, गाजर, कडधान्ये, काजू आणि बिया यांचा आहारात समावेश केल्यास अनेक फायदे मिळतात.